आरेच्या वनजमिनीवर सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर आता आरे वाचवण्यासाठी आलेल्या आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे आरेमध्ये गुन्हे दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात शिवसेनेने निवडणूक प्रचारादरम्यान आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. आरे आंदोलनावेळी एकूण २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या या सगळ्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता त्यांच्यावरील गुन्हे पूर्णपणे मागे घेण्याचाच निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच, येत्या एक ते दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळ खातेवाटपाचा निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे.
हेही वाचा – फडणवीसांची विधानसभेत शायरी; म्हणे, ‘मैं समुंदर हूँ’! भुजबळांनाही टोला!
‘शेतकऱ्यांसाठी फक्त बोलणार नाही’
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांविषयी ठाकरे सरकारची भूमिका देखील स्पष्ट केली. ‘राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्राकडून काय मदत मागणार, ती कशी देणार याविषयी सगळं काही आम्ही करणार आहोत. फक्त मी काय करणार आहे ते मी सांगणार नाही, मी करून दाखवेन’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.