निवडणूक आयोगासमोर भाजपाकडून लोकशाहीचे वस्त्रहरण!

निवडणूक आयोगासमोर भाजपाकडून लोकशाहीचे वस्त्रहरण!

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तब्बल २७ हजार कोटी रुपये खर्च करून निवडणूक आयोगासमोर लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग मात्र धृतराष्ट्र बनून राहिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

लोकशाहीची थट्टा

भाजपाने निवडणुकीवर केलेल्या खर्चावर सचिन सावंत यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी असे म्हटले आहे की, निवडणुका दिवसेंदिवस खर्चिक होत आहेत हे लोकशाहीसाठी घातक आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला असेल तर त्याचे मूळ हे भ्रष्टाचारच असू शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेला हे आव्हानच आहे. ही लोकशाहीची थट्टाच असल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले आहे.

भाजपची चौकशी करा

सेंटर फॉर मीडिया स्टडीजने लोकसभा निवडणूकीत झालेल्या खर्चाचा अहवाल जाहीर केला. या निवडणुकीत तब्बल ६० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. यातील ४५ टक्के म्हणजेच तब्बल २७ हजार कोटी रुपये एकट्या भाजपाने खर्च केले, अशी माहिती या अहवालातून देण्यात आली आहे. भाजपकडे ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा कुठून आला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली

निवडणुकीच्या एकंदर प्रक्रियेला भाजपाने भांडवलशाही, व्यापारपद्धतीने एकाधिकारशाहीकडे नेले आहे. इतर कोणात्याही पक्षाकडे भाजपाऐवढी खर्च करण्याची क्षमता नसून प्रचंड पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा नवा पायंडा भाजपाने पाडला आहे, त्यामुळे लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा – 

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपाचा खर्च तब्बल २७ हजार कोटी

First Published on: June 5, 2019 5:12 PM
Exit mobile version