मंत्रालय ते विधानभवनात भुयारातून कनेक्टिव्हीटी

मंत्रालय ते विधानभवनात भुयारातून कनेक्टिव्हीटी

एमएमआरसीकडून कामाला सुरूवात

मंत्रालयातून पाऊल बाहेर टाकताच थेट विधान भवनात आणि विधानभवनातून थेट मेट्रो स्थानकात हे अंतर भुयारातून कापता आले तर कोणाला आवडणार नाही ? मुंबई रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडून आता या भुयारीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे अंतर भुयारी मार्गाचा वापर करून सहजपणे पार करण्याचा अनुभवता येणार आहे. तसेच मेट्रो स्थानकातून सहजपणे या सगळ्या शासकीय कार्यालयात काही मिनिटात पोहचणे शक्य होईल.

एमएमआरसीकडून मंत्रालय तसेच विधान भवन या दोन्ही परिसरात माती परीक्षणाचे काम आता पूर्ण झाले आहे. तर भुयारी मार्गाच्या डिझाईनचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम एमएमआरसीला देण्यात आले आहे. या कामासाठी लवकरच आवश्यक निधी दिला जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. आतापर्यंत या प्रकल्पाच्या निमित्ताने दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी तंत्रज्ञानाच्या निमित्ताने आवश्यक असणारे कौशल्य हे एमएमआरसीकडे असल्यानेच आम्ही हे काम एमएमआरसीकडे देत आहोत, असेही त्या अधिकार्‍याने सांगितले.

मंत्रालय ते विधान भवन या कामासाठी आम्हाला काम करण्याची विनंती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली आहे. मंत्रालय, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन तसेच मेट्रोचे विधान भवन स्टेशन असा परिसर जोडणारा हा सबवे असे अशी माहिती मुंबई रेल कॉर्पोरेशनचे संचालक एस. के. गुप्ता यांनी दिली. या कामासाठीची सुरूवात आता करण्यात आली आहे. हा संपूर्ण सबवे हा सध्याच्या स्टेशन परिसरात वापरल्या जाणार्‍या कट एण्ड कव्हर पद्धतीने बांधण्यात येईल. तसेच भुयार तयार करण्यासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. या भुयारीकरणाच्या पद्धतीत मर्यादित अशा स्वरूपाचे ब्लास्ट केले जातात. त्यामुळे जमिनीच्या अनेक फूट खाली भुयार करणे सोपे जाते. या संपूर्ण कामासाठी अर्थसंकल्पाअंतर्गत ४०० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच राज्याच्या कॅबिनेटनेही या कामासाठी नुकतीच मंजुरी दिली आहे.

मेट्रो-2अ मार्ग:-

उपनगरात वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता

कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी पश्चिम परिसरांमध्ये दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो-2अ मार्गावरील कामराज नगर येथे मोनोपोल उभारण्यात येणार आहेत. या कामाच्या निमित्ताने १४ जुलै आणि २१ जुलै रोजी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली आहे. टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी पर्यायी यंत्रणा वापरून खंडरहीत विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याची शाश्वती दिलेली आहे. परंतु एैन वेळी काही अडचणी निर्माण झाल्यास वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत होण्याची शक्यता असल्याने टाटा व अदानीच्या वीज ग्राहकांना आगाउ सूचना देणे प्राधिकरणाने आवश्यक मानले, असे प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) श्री. दिलीप कवठकर यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: July 12, 2019 4:37 AM
Exit mobile version