कोरोनामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली; कंपन्यांच्या जबाबदारीत वाढ

कोरोनामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली; कंपन्यांच्या जबाबदारीत वाढ

कोरोनामुळे जगभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या, तर अनेकांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली येऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून समोर आली. अनेक वर्षांपासून मानसिक तणावामध्ये वाढ होत असली तरी कोरोनामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१६ च्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी तणावाखाली असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

जगातील ९९ देशांमधील १४०० कंपन्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजावर झालेल्या परिणामाचा सर्व्हे इंटरनॅशनल एसओएसने इप्सोस मोरी या संशोधन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. यामध्ये भारताचाही समावेश होता. कोरोनाचा फटका कर्मचार्‍यांच्या उत्पादन क्षमतेला बसला असला तरी पुढील वर्षी कोरोनापेक्षा सर्वाधिक फटका हा मानसिक तणावाचा बसणार आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादन क्षमतेत घट झाल्याने अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. तर अनेकजणांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचारी मानसिक तणावाखाली आले आहेत. याचा परिणाम येत्या वर्षात दिसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील वर्षात कोरोनाबरोबरच मलेरिया, डेंग्यू, इबोला आणि झिका यासारख्या संसर्गजन्या आजारांचा परिणामही कर्मचार्‍यांच्या कामावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संसर्गजन्य आजारांचा ९१ टक्के परिणाम कर्मचार्‍यांच्या कामाकाजावर होणार असल्याचे मत सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी मांडले आहे. संसर्गजन्य आजारामुळे कामावर परिणाम होणार असला तरी मानसिक तणावाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे इंटरनॅशनल एसओएसच्या सर्व्हेक्षणात म्हटले आहे. यावर्षी कोरोनामुळे उत्पादन क्षमतेवर झालेल्या परिणामापेक्षा मानसिक तणावामुळे कामावर होणारा परिणाम अधिक असणार आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा घरगुती कर्मचारी (८५ टक्के), सहाय्यक (८१ टक्के), विद्यार्थी आणि शिक्षक (८० टक्के) कामगार आणि व्यवसाय प्रवासी (७९ टक्के) असा असल्याचे सर्व्हेक्षणात म्हटले आहे.

इंटरनॅशनल एसओएसने घेतलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये निम्म्यांपेक्षा जास्त व्यक्तींनी आरोग्य आणि नोकरीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. पुढील वर्षात या दोन चिंता सर्वाधिक भेडसावणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे कर्मचार्‍यांना भेडसावणार्‍या मानसिक तणावाच्या परिणामाचा सामना करण्यासाठी कंपन्यांना पुरेशा संसाधनाची आवश्यकता लागणार आहे. तसेच ९/११ च्या हल्ल्यानंतर कर्मचार्‍यांची काळजी घेण्याची जबाबदारी कंपन्यावर आली होती. त्याचप्रमाणे कोरोनाच्या संकटानंतर कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजीची जबाबदारी आता कंपन्यांनी घेणे गरजेचे असल्याचे मतही या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आले आहे.

कोविडमुळे जगभरात सार्वजनिक आरोग्य, भौगोलिक व आर्थिक संकटांमुळे त्रिपक्षीय संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम व्यवसाय आणि कर्मचार्‍यांवर झाला आहे. कर्मचार्‍यांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत आहेत. यामुळे कर्मचार्‍यांनी त्यांच्या नोकरीची सुरक्षा आणि आरोग्य याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
– डॉ. राहुल कालिया, वैद्यकी संचालक, इंटरनॅशनल एसओएस
First Published on: December 17, 2020 4:12 PM
Exit mobile version