कोरोनामुळे गेल्या ६ महिन्यांपासून फक्त मुंबईतलंच नाही तर राज्यभरातलं आणि देशभरातलं वातावरण नकारात्मक झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र, आता त्यातूनही काही सकारात्मक बाबीत घडू लागल्या आहेत. आज राज्यात २६ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. पण मुंबईचा विचार केला, तर गेल्या २४ तासांत तब्बल ५ हजार ०३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकट्या मुंबईचा Corona Recovery Rate ८० टक्क्यांवर गेला आहे. कोरोनाच्या सगळ्या गोंधळामध्ये मुंबईकरांसाठी ही आशादायी बाब म्हणावी लागेल. यासोबतच मुंबईतला रुग्णवाढीचा दर ५७ दिवसांवर गेला आहे. अर्थात ५७ दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात २२३६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४४ रुग्ण दगावले आहेत. यापैकी ३३ रुग्णांना कोरोनाची लागण होण्याच्या आधीपासून दीर्घकालीन आजार होते. त्यात ३३ रुग्ण पुरूष तर ११ महिला होत्या.