पालघरच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात दाखल असलेल्या ५० वर्षीय रुग्णाचा आज संध्याकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाला. सफाळे जवळील उसरणी गावचा रहिवाशी असलेल्या मृत रुग्णाला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी कस्तुरबा रुग्णालयातून त्याचा रिपोर्ट पॉसिटिव्ह आला होता. पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला हलवण्यात येणार होते. पण, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. हा इसम काही दिवस सफाळे येथे आपल्या नातलगाकडे राहिला होता. त्यामुळे प्रशासनाने सफाळे परिसरात मनाई आदेश जारी करून लोकांची ये-जा बंद केली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून सर्व वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घातली आहे.
A 50-year-old #COVID19 positive patient has passed away in Palghar, Maharashtra. He was admitted to a hospital since March 28: Palghar District Hospital.
— ANI (@ANI) March 31, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढता दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता महाराष्ट्राची चिंता अधिक वाढली आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा ३०२ झाला आहे. तर एकट्या मुंबईत ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईत एकाच दिवशी ५९ रुग्ण आढळले आहेत. तर, त्या पाठोपाठ १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथे आढळले असून सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. त्यामुळे, नक्कीच महाराष्ट्र सर्वात मोठ्या धोक्याच्या उंबरठ्यावर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात संसर्गातून रुग्ण आढळत नसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. पण, आता संसर्गातून पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रात ही चिंतेची बाब आहे.