राज्यात आज दिवसभरात ९७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा एका दिवसातला आकडा आहे. मात्र, मुंबईत देखील हा आकडा वाढता असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३९ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार ६५ इतकी झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत एक हजाराहून जास्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतली एकूण रुग्णसंख्या आता ३२ हजार ७९१ झाली आहे. त्यासोबतच ४१० रुग्ण आज दिवसभरात आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा देखील वाढून ८ हजार ८१४ झाला आहे.
मृत्यू झालेल्या ३९ जणांमधील २५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २८ पुरुष तर ११ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील चार जणाचे वय ४० वर्षांखाली आहे. १२ जण हे ६० वर्षांवरील, तर २३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ८६६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २६ हजार ८२२ वर पोहचली आहे. तसेच ४१० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ८८१४ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.