दिवा डम्पिंगचा प्रश्न धुमसतच…!

दिवा डम्पिंगचा प्रश्न धुमसतच…!

दिव्यातील डम्पिंग बंद करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. मात्र, अनेक वर्षे डम्पिंग केलेल्या कचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे. यासाठीच शनिवारी सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला. या विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेसाठी तब्बल २१८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च असल्याच्या प्रस्तावावर बोलताना माजी विरोधी पक्ष नेते नजीबमुल्ला यांनी इतर महापालिकेच्या तुलनेत ठाणे पालिकेच्या प्रकियेत १४० कोटी अतिरिक्त असल्याचा आरोप केला. तर सभागृहात पुरावाही सादर केल्याने एकच खळबळ उडाली. तेव्हा हा प्रस्ताव सुधारित करून पुन्हा पटलावर आणावा, अशी मागणी मुल्ला यांनी केली. तर सत्ताधारी शिवसेनेने मात्र, कचर्‍याचे काय करायचे ते करा पण ३१ डिसेंबरपासून दिव्यात डम्पिंगला नो एंट्री राहणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीच ठाण्यात कचर्‍याचे साम्राज्य दिसण्याची शक्यता बळावली आहे.

दिव्यातील स्थानिक नगरसेवकाने मात्र जी जागा अगोदरच सपाट केलेली आहे. त्या जागेसाठी एवढा मोठा निधी खर्च करण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक पाटील यांनी तर जागेचे फोटोच सभागृहात सादर केले. अन् पालिका प्रशासनाला सभागृहात आव्हान दिले की सादर जागेवर पाच फुटापेक्षा जास्त कचरा निघाल्यास पदाचा राजीनामा देण्याचे थेट आवाहन बाबाजी पाटील यांनी दिले. नजीबमुल्ला यांनी या जागेवर खर्च करण्यात येणार खर्च चुकीचा असून महाराष्ट्र प्रदर्शन महामंडळाने बजावलेल्या नोटीस नंतर पालिका प्रशासनाला जाग आलेली आहे. प्रस्तावावर असलेले पालिकेचे ज्यादा दार आहेत. त्या तुलनेत उल्हासनगर महापालिकेने पर मेट्रीक टनसाठी 478 रुपये तर ठाणे पालिकेने एका टनाच्या कचर्‍यासाठी ९५० रुपयांचा खर्च प्रस्तावात दिला आहे. दिव्यातील बंद झालेल्या डम्पिंगसाठी 41 हजार मीटरवर कचरा पकडला तर त्याखाली पाच मीटर अधिक कचरा पकडला तरी याचा एकूण खर्च हा 75 ते 80 कोटींच्या वर जाऊ शकत नाही, असे असताना पालिका ही सुपारी का वाजवते, असा थेट आरोप त्यांनी केला.

First Published on: December 23, 2019 1:26 AM
Exit mobile version