मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एक अजब गाणे बनवले आहे. महाराष्ट्रात अणि मुंबईत असणाऱ्या खड्ड्यांपासून सुटका न होता आपल्या आजुबाजुला खड्डेच खड्डे पाहायला मिळत असल्याचे बोल या गाण्यात आहेत. खड्डेच खड्डे असल्यामुळे पावसाळा आला तर स्विमिंग पूलची गरज पडत नाही, खड्डयात साचलेले पाणी म्हणजे आपल्यासाठी आयता पूल तयार होतो, असे म्हणत या गाण्यातून महेश टिळेकर यांनी प्रशासनाला टोमणा लगावला आहे.
या संदर्भातला गाण्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबूकवर शेअर केला आहे. ज्या व्हिडिओत भार्गवी चिरमुले, स्मिता शेवाळे आणि जेष्ठ अभिनेते विजु खोटेसुद्धा दिसत आहेत.
खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमूळे होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रशासनावर टिका केली जात आहे. मुंबईत कल्याणमध्ये रस्त्यावरचे खड्डे अनेकांच्या जीवावर बेतले असून आज खड्ड्यांमुळे ५ वा बळी गेलेला आहे. खड्डयांमुळे लोकांचा जीव जात आहे, मात्र कोणालाही याची पर्वा नाही. याउलट अश्या घटनांच्या संख्येत वाढ झाली असल्याने आता ‘सेलिब्रेटी’सुद्धा खड्ड्यांवर उपरोधिक गाणी बनवत यंत्रणेचे कान टोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
खड्डेमुक्त महाराष्ट्राचे काय झाले?
राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि व्यावसायिक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र खड्डेमुक्त करु, असे आश्वासन दिले होते. पण खड्डे काही केल्या बुजत नाहीत मात्र लोकांचा नाहक जीव जात आहे. लोकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यामुळे खड्डेमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न फोल ठरल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
मल्लिष्कानेही केली होती टीका
दरम्यान गेल्यावर्षी आरजे मलिष्काने मुंबईत पाणी तूंबुन मुंबईची दरवर्षी तुंबई होत असल्याने पालिकेवर एक गाणे बनवले होते. बीएमसी ‘तुला माझ्यावर भरोसा नाय का’ असे या गाण्याचे बोल होते. हे गाणे सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले होते. या गाण्यानंतर पालिकेची बदनामी झाल्याचा आरोप करत शिवसेना विरुद्ध मलिष्का असा वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर आता मुंबई आणि महाराष्ट्रातल्या खड्ड्यांवर भाष्य करणारे हे गाणे बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गाणे दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी स्वत: बनवले आहे.