मराठी दिग्दर्शक विजू माने यांनी नुकतीच एक पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. विजू माने यांनी ‘डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि दुरावस्था ही युती कधीच तुटणार नाही. आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला मात्र उद्याचं काही माहित नाही.’, असे या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांनी लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. ठाण्यात चित्रपट दिग्दर्शक विजू मानेंसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
असा घडला प्रकार
ठाण्यातील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एका कार्यक्रमानिमित्त दिग्दर्शक विजू माने हे गेले होते. यावेळी लिफ्ट बंद झाल्याने अर्ध्यातच अडकून पडण्याचा जीवघेणा प्रकार त्यांच्यासोबत घडला. विजू माने या नाट्यगृहाच्या VIP लिफ्ट मधून कार्यक्रम स्थळी जात होते. त्यावेळी अचानक लिफ्ट बंद पडली आणि ते अर्ध्यावरच अडकले. त्यांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा नाट्यगृहाच्या सुरक्षाकर्मींच्या अथक प्रयत्नांनंतर विजू माने हे लिफ्ट मधून सुखरुप बाहेर आले आणि त्याचा जीव थोडक्यात बचावला.
नाट्यगृहांवर ठाणे मनपा कोट्यावधी रुपये खर्च करते पण…
काशिनाथ नाट्यगृहाची VIP लिफ्ट कित्येक दिवसांपासून खराब असल्याचे तिकडच्या काही कर्मचार्यांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर तरी ठाणे महानगर पालिकेला जाग येणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. दरम्यान यापूर्वी देखील अभिनेता सुमित राघवन याने नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल ठाणे महानगर पालिकेचे सोशल मिडायावर चांगलेच वाभाडे काढत नाट्यगृहाबाबत असलेल्या गैरसोयींचा पाढा वाचला होता. त्यामुळे ठाण्यातील नाट्यगृहांवर ठाणे महानगर पालिका कोट्यावधी रुपये खर्च करत असते तरी अशा घटना घडतात कशा? त्यामुळे पालिका प्रशासन नाट्यगृहांबाबत किती गंभीर आहेत हे देखील स्पष्ट होत आहे.