रिक्षाचालकांनो उद्धट वर्तन कराला तर खबरदार – दिवाकर रावते

रिक्षाचालकांनो उद्धट वर्तन कराला तर खबरदार – दिवाकर रावते

परिवहनमंत्री दिवाकर रावते

कल्याण रेल्वे स्थानक येथे रिक्षाचालकांकडून वाहतूक विभागाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासंबंधी घडलेल्या घटनेची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तातडीने दखल घेतली. या परिसरातील प्रवासी आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी उर्मट, उद्धट वर्तन केल्यास खबरदार असे खडेबोल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षाचालकांना सुनावले असून गैर वर्तनकरणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे घेतला तडकाफडकी निर्णय

वाहतूक विभागाच्या महिला कर्मचारी आशा गावडे या आपले कर्तव्य बजावत असताना रिक्षाचालकाकडून त्यांनी परवाना मागितला, त्या वेळेस परवाना न देता रिक्षा चालकाने महिला कर्मचाऱ्यास फरफटत नेले. या घटनेची दखल घेत परिवहनमंत्री रावते यांनी रिक्षाचालकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

१८४ रिक्षाचालकांना बजावली नोटीस

रिक्षाचालकांविरुद्ध वारंवार उद्धट वर्तन, भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, विना परवाना, विना बॅच, विना परवाना वाहन चालविण्याची तक्रार होत असल्यास कल्याण-डोंबिवली भागातील रिक्षाचालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या मोहीमेअंर्गत आजपर्यंत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १०२५ रिक्षा चालकांची तपासणी केली. त्यापैकी १८४ रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. यापैकी ६० वाहने ताब्यात घेतली आहेत.

या मोहिमेसाठी १० पथकांची नियुक्ती

या मोहिमेसाठी परिवहन विभागाच्या ठाणे, पनवेल, मुंबई पूर्व आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण आणि वसई येथील वायुवेगपथकामार्फत १० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ज्या वाहनांना परवाने नसतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार वाहन मालक तसेच परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

First Published on: October 11, 2018 10:30 PM
Exit mobile version