हयातीचा दाखला सादर करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

हयातीचा दाखला सादर करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हयातीचा दाखला सादर करण्यास निवृत्तिवेतनधारकांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हयातीचा दाखला सादर करण्यास पुन्हा एकदा निवत्तिधारकांना मुदतवाढ दिली आहे. २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दाखला सादर करता येणार आहे.

राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निवृत्तिवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ दिली. त्यानुसार राज्य सरकारनेही राज्यातील निवृत्त कर्मचार्‍यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र निवृत्तिवेतनधारक हे ६० वर्षांवरील आणि अनेक आजारांनी त्रस्त असल्याने तसेच बँकेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने निवृत्तिवेतनधारकांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार २८ फेब्रुवारी २०१२ पर्यंत राज्यातील सर्व शासकीय निवृत्तिवेतनधारकांसह अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालये, व कृषी विद्यापीठे आणि जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारकांना दाखला सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

First Published on: December 8, 2020 2:47 PM
Exit mobile version