महात्मा फुले योजनेत कोरोनाग्रस्त नागरिकांची फसवणूक – मनसेचा आरोप 

महात्मा फुले योजनेत कोरोनाग्रस्त नागरिकांची फसवणूक – मनसेचा आरोप 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार कारोनाबाधित रुग्ण तसेच करोनाचाी लागण नसलेल्या राज्यातील 12 कोटी नागरिकांना या योजनेंतर्गत उपचार घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र अवघ्या काही दिवसांतचही ही योजना फसवी असल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेंतर्गत फक्त व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांनाच फायदा होत असून, कोरोना रुग्णांना मात्र खासगी हॉस्पिटलचे बील भरावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे याविरोधात मनसेकडून न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनेक व्याधींवर मोफत उपचार करण्यात येतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व खासगी हॉस्पिटलकडून होणारी लूट लक्षात घेऊन राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर या योजनेतर्गत मोफत उपचार करण्याची घोषणा एप्रिलमध्ये केली. त्याचप्रमाणे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 1 लाख 20 हजार रुग्णांवर मोफत उपचार झाल्याची माहिती नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांकडून सरकारचे कौतूक करण्यात येत होते. परंतु आरोग्यमंत्र्यांचा हा दावा खोटा असून, त्यांनी नागरिकांची फसवणूक केली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. कोरोना रुग्ण व्हेंटिलेटवरवर असेल तरच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत त्याचा उपचार मोफत होतो. तसेच हेल्पलाईन क्रमांकावर (१५५३८८/ १८००२३३२२००) संपर्क केल्यास व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांनाच मदत मिळते अशी माहिती दिली जाते. हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यास हेच उत्तर मिळते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या ही एक ते दोन टक्केपेक्षा जास्त नाही. त्यामुळे महाराष्ट्रात १ लाख 80 हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना १ लाख २० हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल असा प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे खोटे बोलत आहेत आणि नागरिकाला उल्लू बनवत आहेत, त्यासाठी त्यांनी एक तर 1 लाख 20 हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रिपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी काळे यांनी केली. तसेच यासंदर्भात आपण न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे अनुभव राज्यातील नागरिकांनी घेतले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रीपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा.
– गजानन काळे, अध्यक्ष, मनसे नवी मुंबई

विविध प्रकारच्या 977 दीर्घकालीन आजार आहेत. अशा आजारांमध्ये एक रुपयासुद्धा रुग्णाला भरावा लागत नाही. कोरोनाबाधित रुग्णाला दीर्घकालीन आजाराबरोबरच वेगवेगळे आजारही असतात. अशा लोकांवर उपचार मोफतच केले जातील. तात्पुरत्या स्वरुपातील आजार हे अलक्षणीय असले तरी लक्षण असलेल्या आजारांवर राज्यातील एक हजार हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जात आहेत. आपण जिल्हास्तरावर महागडे इंजेक्शन किंवा औषधे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते ही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
– राजेश टोपे, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र 

First Published on: July 2, 2020 7:51 PM
Exit mobile version