मुंब्र्यात एकाच दफनभूमीत १४२ मृत्यू, मग ठाण्यात फक्त २७७ कसे? – किरीट सोमय्या

मुंब्र्यात एकाच दफनभूमीत १४२ मृत्यू, मग ठाण्यात फक्त २७७ कसे? – किरीट सोमय्या

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुंब्रा येथील एका दफनभूमीतच कोरोना आणि कोरोना संशयित १४२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावरून मुंबईप्रमाणेच ठाण्यातही मृतांची संख्या दडपण्यात येत आहे. ठाण्यात ८०० नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची शंका असून, त्यातील ४०० मुंब्र्यातील आहेत, असा आरोप भाजपाचे ठाणे प्रभारी आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर मुंब्र्यातील ४ पैकी दोन दफनभूमी क्षमता संपल्यामुळे बंद करण्यात आल्या असून उर्वरित दोन्ही दफनभूमी महिन्याभरात बंद पडतील, याकडे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले.

कोरोनामुळे ठाणे शहरातील परिस्थिती गंभीर होत असल्याबरोबरच विविध उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाणे महापालिकेकडून मृतांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाबाबत महापालिका प्रशासनाला खात्री देण्यासाठी किरीट सोमय्या, निरंजन डावखरे, महापालिकेतील भाजपा गटनेते संजय वाघुले यांनी आज मुंब्र्याचा दौरा केला. तेथील चारही दफनभूमीतील नोंदींनुसार माहिती घेतली. त्यावेळी एम. एम. व्हॅलीनजीकच्या एका स्मशानभूमीत कोरोना आणि कोरोना संशयित म्हणून तब्बल १४२ नागरिकांचे दफनविधी झाले असल्याचे तेथील रखवालदाराने आणि कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. २२ मार्चपासून दररोज १४ ते १५ मृतदेह येत होते. त्यामुळे मुंब्रा-कौसा भागात कोरोनामुळे तब्बल ४०० जणांचे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तर ठाणे शहरात ही संख्या ८०० पर्यंत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

१ एप्रिल ते २३ जून दरम्यान मुंब्रा आणि कौसा कब्रस्तानात ९५३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांवर दफन/अंत्यसंस्कार झाले. मार्चमध्ये १३७ मृत्यू झाले ते वेगळेच. एकट्या कौसा कब्रस्तानमध्ये १४२ कोविड मृतदेह पुरण्यात आले. मात्र, ठाकरे सरकारच्या मते ठाण्यात एकूण २७७ कोव्हीड मृत्यू झाले आहेत! ही ठाण्यातली अत्यंत धक्कादायक स्थिती आहे!

किरीट सोमय्या, भाजप ठाणे प्रभारी

मुंब्रा दफनभूमीत मार्चमध्ये ७४, एप्रिलमध्ये १६० आणि २३ जूनपर्यंत १७३ नागरिकांचे मृत्यू झाले. कौसा दफनभूमीत मार्चमध्ये ६३, एप्रिलमध्ये ८२, मेमध्ये २४० आणि २३ मेपर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७७ मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र, मुंब्रा-कौसा भागातच १ एप्रिल ते २३ जूनपर्यंत ९५३ नागरिकांचे दफनविधी पार पडले आहेत. कोरोनामुळेच मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे, याकडे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

दफनभूमीची क्षमता संपूनही मुंब्र्यातील मंत्री गप्प : निरंजन डावखरे

कोरोनाच्या संसर्गाने होणाऱ्या वाढत्या मृत्युंमुळे मुंब्रा-कौसा येथील चार दफनभूमींपैकी दोनची क्षमता संपली आहे. आणखी महिनाभरात दोन दफनभूमींमध्ये जागा राहणार नाही. त्यानंतर दफनविधी कुठे करायचे? हा प्रश्न आहे. मात्र, या विषयावर मुंब्रावासियांचे प्रतिनिधित्व करणारे मंत्रीमहोदय गप्प का आहेत? असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केला. या प्रश्नावर राज्य सरकार आणि महापालिकेवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. मुंब्रा वासियांसाठी तात्काळ दफनविधीसाठी मोठी जागा राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे.

First Published on: June 26, 2020 6:34 PM
Exit mobile version