गोविंदा पथकेही उतरली रक्तदानात 

गोविंदा पथकेही उतरली रक्तदानात 

कोरोनाच्या संकटामुळे यंदा थरावर थर रचत जल्लोष करणारा दहीहंडीचा उत्सव साजरा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला उत्सव यंदा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा करण्याचा दहीहंडी उत्सव समितीने घेतला आहे. मुंबईतील गोविंदा पथकांनी यंदा रक्तदान व प्लाझ्मादान करण्याचे ठरवले असून गोपाळकालाच्या दिवशी शहरामध्ये रक्तदानाची शिबिरे भरवण्यात येणार आहे. दहीहंडी खेळणारे बाळगोपाळ हे दहीहंडी खेळताना जितके निर्भीड, कणखर, बिनधास्त असतात तितकीच समाजप्रती आपली जबाबदारी जपताना संवेदनशील असतात हे दाखवून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी यंदा सर्वच गोविंदा पथकांनी व आयोजकांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी दहीहंडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांचा बिनधास्तपणा, एकी, एकमेकांवरील विश्वास, उंचच उंच हंडी फोडण्याचा आत्मविश्वास पाहायला मिळातो. त्यामुळे कोरोनाच्या संकटात हा गोविंदा किती सजग आणि समाजाशी बांधिलकी जपणारा आहे, हे दाखवण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. कोरोना संकटामध्ये राज्याला सर्वाधिक ‘रक्त’ आणि ‘प्लाझ्मा’ची आवश्यकता आहे. ही गरज ओळखून गोविंदा पथकांनी यंदा गोपाळकालाच्या दिवशी रक्तदान व प्लाझ्मादानची शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच दहीहंडी उत्सव समितीची ऑनलाईन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये ज्या मंडळांकडे काही वेगळ्या संकल्पना किंवा विषय असतील तर त्या दहीहंडी उत्सव समितील कळवल्यास त्यावरही विचार करण्यात येईल, असे दहीहंडी उत्सव समितीकडून सांगण्यात आले आहे.

कसे करणार कार्यक्रम

रक्तदान शिबिर किंवा अन्य कार्यक्रम करताना आसपासच्या गोविंदा मंडळांनी एकत्र येऊन करावेत, त्याचप्रमाणे सरकारी नियमांचे पालन सामाजिक अंतर राखत हे उपक्रम राबवायचे आहेत. मंडळांनी राबवलेल्या उपक्रमाची माहिती मंडळाचे नाव, केलेले कार्य, त्याची काही क्षणचित्रे समितीकडे पाठवण्यात यावीत, असे आवाहन दहीहंडी उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

First Published on: July 7, 2020 2:44 PM
Exit mobile version