यापुढे निवडणूक लढवणार नाही, राजकारणाने पातळी सोडली – हितेंद्र ठाकूर

यापुढे निवडणूक लढवणार नाही, राजकारणाने पातळी सोडली – हितेंद्र ठाकूर

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर

‘राजकारणाने आता पातळी सोडली आहे. वसई तालुक्यात चुकीची माहिती पसरवून नाहक बदनामी केली गेली. त्यामुळे आता ही निवडणूक शेवटची होती’, असे हिंतेंद्र ठाकुर म्हणाले आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय आपण निवडणूक लढवत नसलो तरी राजकारण सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हिंतेद्र ठाकूर वसई विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करुन यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले आहे.

राजकारणात आता दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली – हितेंद्र ठाकूर

‘राजकारणाने पातळी सोडली आहे. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. माझ्या पत्नीला यावर भाष्य करावे लागले. सौभाग्य आणि कोक संपविणाऱ्यांना जागा दाखवा, असे आवाहन करावे लागले. ही घटना दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे’, असे ठाकूर म्हणाले. पालघरच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर हे मोठे नाव आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने इतर पक्षांना दिलासा मिळेल. पण मी निवडणूक सोडली आहे, राजकारण नाही, असे विधान करून त्यांनी राजकिय पक्षांना आव्हान केले आहे. राजकीय रणनित्या आखण्यात तरबेज असलेले हितेंद्र ठाकूर निवडणुकीत सक्रीय नसले तरी इतर पक्षांना डोकेदुखी ठरणार आहेत.

First Published on: October 22, 2019 5:10 PM
Exit mobile version