अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही – दरेकर

अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही – दरेकर

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरु होत असून, विरोधक आतापासूनच सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा मनसुबा रचत आहेत. त्यातच मागील २४ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या मराठा तरुणांमुळे आता विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले असून, यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरूवारी संकेत दिले आहेत. आझाद मैदानात मराठा समाजातील तरुणांचे मागील २४ दिवसांपासून आंदोलन सुरू असून, जर मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर सोमवारपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही असा इशाराच दरेकर यांनी दिला आहे.

गुरुवारी सकाळी त्यांनी आंदोलनाला बसलेल्या तरुणांची भेट घेत सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी ‘या सरकारची मला किव येते असे म्हणत, फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात कुठेही आंदोलने झाली की लगेच चर्चेला बोलवत होते आणि मार्ग काढला जात होता. मात्र आता या ठिकाणी मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचे सरकार संवेदनहीन असल्याचे दिसत नसल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली’, तसेच जर या साडेतीन हजार लोकांसाठी जर संतापाचा लोट झाल्यास याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. या सोबतच ‘सरकार आणणारी आणि खाली करणारी देखील हेच लोक असल्याचे सांगत अधिवेशन सुरू होण्याआधी या लोकांना न्याय द्या अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही’ असा इशाराच दरेकर यांनी दिला. दरम्यान यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की हे सरकार स्थगिती देण्यात मशगुल झाले असून, फडणवीस सरकारने लोकहिताचे जे काही निर्णय घेतले अशा अनेक निर्णयांना स्थगिती दिली जात आहे.

विरोधकांचा आक्रमक पवित्रा बघता सरकारने देखील कंबर कसली असून; प्रकाश मेहता, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल राज्य सरकार विधी मंडळात आणण्याच्या तयारी आहे. याबद्दल दरेकर यांनी विचारले असता, ‘आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे दरेकर यांनी सांगत जेवढी चौकशीची घाई हे सरकार करत आहे तेवढी घाई विकास कामे पूर्ण करण्यासाठी करावी’ असा टोला देखील दरेकरंनी लगावला आहे.

First Published on: February 20, 2020 5:49 PM
Exit mobile version