मंगळवारी सायंकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबई ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे. अशा परिस्थितीतही काही लोक घराबाहेर पडून स्वतः जीव धोक्यात घालत आहे. कुलाबा येथील गेटवे ऑफ इंडिया याठिकाणी समुद्राच्या किनार्यावरील कट्ट्यावर बसलेला तरुण चक्कर आल्याने पाण्यात पडला. पण सुदैवाने मुसळधार पावसातही मुंबई पोलिसांनी धाव घेऊन या तरुणास बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचला.
माहितीनुसार, कुलाबा पोलीस ठाणे हद्दीतील गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्रकिनारी फिरावयास गेलेला २७ वर्षीय तरुण विजय कुंडी वाल्मिकी गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी समुद्रालगत असणाऱ्या कठड्यावर बसला होता. पण त्यादरम्यान तो चक्कर येऊन तो समुद्राच्या पाण्यात पडला. मग तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस पथक पो.उप.निरी.लब्दे, पो.उप.निरी, नरोडे, पोलीस नाईक, भांगरे, आणि महिला पोलीस शिपाई यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ कुलाबा मोबाईल-३ या गाडीतील रोप त्याच्या मदतीकरिता समुद्रात सोडून रोपच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याच्यावर प्रथमोपचार देऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मुसळधार पावसामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी आधी सूचना देऊनही लोक घराबाहेर पडत होते आणि समुद्रकिनारी फिरताना दिसत होते.
हेही वाचा – मुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली