इंदुमिलच्या पायाभरणीतच महाविकास आघाडीचा समन्वय चुकला

इंदुमिलच्या पायाभरणीतच महाविकास आघाडीचा समन्वय चुकला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

इंदुमिलच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या निमंत्रणाच्या घोळामुळे आणि नाराजांच्या उफाळून आलेल्या वादामुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री, विऱोधी पक्षनेते, आंबेडकरी संघटना तसेच माध्यमांनाही याबाबतची माहिती आणि निमंत्रण देण्यात आले नव्हते. सुरूवातीला फक्त १६ जणांनाच याबाबतचे निमंत्रण देण्यात आले होते अशी चर्चा होती.

कोरोनाचे संकट लक्षात घेता खूपच मर्यादित अशा व्यक्तींना इंदू मिलच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाणे निमंत्रण पाठविण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे एमएमआरडीएने माध्यमांना पाठवलेल्या निमंत्रणात फक्त महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना, आमदार, महापौर आणि पालकमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबईचे पालकमंत्री अस्मम शेख, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सदा सरवणकर यांना निमंत्रित करण्यात आले होते.

पण निमंत्रणावर आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत टीका केली आहे. राज्यात कोरोनाचे संकट सुरू असताना इतक्या घाईने हा कार्यक्रम उरकण्याची काय गरज होती असा सवाल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. एमएमआरडीएच्या कामावर टीका केल्यानेच त्यांच्याकडून सुरूवातीला मला निमंत्रण पाठवण्यात आले नाही. पण माध्यमांनी हा विषय उचलल्यावर मात्र निमंत्रण पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकरांनी निमंत्रण कुणाला द्यायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असे भाष्य केले.

एमएमआरडीए या संपुर्ण प्रकल्पात फक्त प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठीचे काम करत आहे. एमएमआरडीएने माध्यमांना दुपारी निमंत्रण पाठवले. पण या निमंत्रणाच्या संपुर्ण प्रकरणावर भाष्य करणार नाही असे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयातून हे निमंत्रण पाठवण्यात आल्याची चर्चा होती.

सर्व सहभागाने इंदू मिलची पायाभरणी 

सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.


 

First Published on: September 18, 2020 3:06 PM
Exit mobile version