आयुक्त गोविंद बोडके यांची जाता जाताही हातसफाई?

आयुक्त गोविंद बोडके यांची जाता जाताही हातसफाई?

कल्याण – डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी बदली आदेश आल्यावर जाता जाता नगररचना विभागासारख्या मलईदार खात्यात काही कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या. मात्र त्याच आता वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हे आहेत. पदभार सोडला असतानाही त्यांनी दोन दिवस आयुक्त बंगल्यावर अनेक फाईलींवर स्वाक्षर्‍या केल्याचीही जोरदार चर्चा पालिका वर्तुळात केली जात आहे. या सर्व प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता असल्याने बदल्यांना स्थगिती द्यावी व मंजूर केलेल्या फाईलींची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवकचे कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. राज्य शासनाने आयुक्त गोविंद बोडके यांची १३ फेब्रुवारी रोजी बदली केली.

नवे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दुसर्‍याच दिवशी त्यांच्याकडून आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. असे असतानाही गोविंद बोडके यांनी जाता जाता नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रसाद सकदेव यांची बदली करत त्यांच्या जागी जलनिस्सारण विभागातील शिरीष नाकवे याची नियुक्ती केली. त्याशिवाय सुखदेव गजरे या लिपिकालाही नगररचनामध्ये आणण्यात आले. तर काही महिन्यांपूर्वीच पालिकेच्या सेवेत घेण्यात आलेल्या लाचखोर प्रभाग अधिकारी स्वाती गरुड यांनाही थेट ‘अ ’ प्रभागाच्या कर अधीक्षक पदाची बक्षिसी देण्यात आली. त्याशिवाय नगररचना विभागातील बांधकाम परवानग्या, मालमत्ता विभागातील होर्डिंगच्या परवानग्या आणि बांधकाम विभागातील विविध विकास कामांचे कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांना देखील गोविंद बोडके यांनी १३ फेब्रुवारीच्या तारखा टाकून मंजुर्‍या दिल्या.

यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून काही आयुक्तांच्या मर्जीतील काही अधिकारी व कर्मचार्‍यांचाही सहभाग असल्याचे सुधीर पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव तसेच अँटिकरप्शन विभाग यांनाही याबाबतच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.

First Published on: February 19, 2020 5:34 AM
Exit mobile version