कोरोना उपचारांना विलंब करणे, म्हणजे तुम्हीच तुमच्या मृत्यूला आमंत्रण देणे

कोरोनाच्या पहील्या लाटेनंतर आता दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी कोरोनाबाधितांच्या व मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या आकड्यात सतत चढउतार होत आहे. यामुळे कोरोनाचे निदान झाल्यावर आजार अंगावर काढू नका. तात्काळ उपचार सुरू करा. अशा सूचना आरोग्य यंत्रणेकडूनही वर्षभरापासून दिल्या जात आहेत. पण याच सूचनांना गांभीर्याने न घेतल्याने किंवा भीतीने अनेकजणांनी रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ केली. तर काहीजणांनी रुग्णालयात जाण्यास विलंब केला. याच दिरंगाईमुळे अनेक कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब वैद्यकीय विश्लेषणातून समोर आली आहे.

विशेष म्हणजे २०२० मध्ये पहील्या लाटेत रुग्णालयात दाखल केल्यापासून पहील्या पाच दिवसांमध्ये मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १८ हजार १८६ एवढा होता. तर यावर्षी २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत पहील्या पाच दिवसात दगावणाऱ्यांची संख्या २४ हजार ७१७ एवढी झाली.

पहील्या लाटेत रुग्णालयात दाखल केल्यापासून दहा दिवसाच्या आत ५३० जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत ही संख्या १४ हजार ३४७ होती.

पहील्या लाटेत ८० ते ९० दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असताना ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर दुसऱ्या लाटेत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे.

ही धक्कादायक बाब असून २०२० मध्ये जून महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आलेल्या पहील्या लाटेने हाहाकार उडवला होता. त्यावेळी कोरोनाबदद्ल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परिणामी बरेच जण रुग्णालयात दाखल होण्यास तयार नव्हते. पहील्या लाटेत ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्यांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली होती. तर त्या तुलनेत रोगप्रतिकारकशक्ती अधिक असलेल्या तरुणांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी होते. पण ते सुपरस्प्रेडर ठरले होते. तसेच पहील्या लाटेत कोरोनामृतांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाणही कमी होते.

पण दुसऱ्या लाटेत मात्र सगळ्याच वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. तसेच भीती व अतिआत्मविश्वासामुळे अनेकांनी आजारपण अंगावर काढलं. तर अपुरे ऑक्सिजन बेडमुळेही अनेकांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला.

First Published on: July 12, 2021 6:58 PM
Exit mobile version