मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोप, दावे – प्रतिदावे केले जात आहेत. आज बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. या मतदार संघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. तर शिंदे गटाने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे पराभूत होणार असा दावा केला आहे. तर, संजय राऊतच ठाकरे पिता – पुत्रांना तुरुंगात पाठवण्याची तयारी करत असून ठाकरे गटाचे केंद्र आता मातोश्री नव्हे तर बारामती झाले असल्याचे आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
हेही वाचा : Lok Sabha 2024 : तीन बोटे आपल्याकडे येतात हे विसरू नये, ठाकरे गटाने मोदींना सुनावले
बारामतीत सुप्रिया सुळे पराभूत होणार असा दावा पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला. ते म्हणाले की, “शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचं नातं तुटणार नाही, ते पवार कुटुंब आहे. तर रोहित पवारांनी पराभव मान्य केला आहे. म्हणून व्हिडिओ ट्वीट करणे, धमकावणे आणि शरद पवारांचा वारसदार आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत हे लोकांच्या लक्षात येते आहे,” अशी टीका संजय शिरसाट यांनी केला आहे.
हेही वाचा :Lok Sabha 2024 : फडणवीस तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री, संजय राऊतांचा थेट हल्लाबोल
शिवसेना नेते संजय शिरसाट पुढे म्हणाले की, “ठाकरे गटाचे प्रवक्तेच बारामती हे केंद्र झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता मातोश्री केंद्रस्थानी राहिलेले नाही.” असा दावादेखील त्यांनी केला. संजय राऊतांवर टीका करताना ते म्हणाले की, “संजय राऊत हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कसे जेलमध्ये जातील याची तयारी करत आहेत. शिवसेनाप्रमुखांनंतर प्रभावी नेता म्हणून उद्धव ठाकरे नसून ते शरद पवार आहेत, असे अनेकदा राऊतांनी दाखवून दिले आहे. आदित्य ठाकरेंना संजय राऊतच स्क्रिप्ट लिहून देतात.” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
Edited By : Abhijeet Jadhav