वांद्र्याच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आग लागल्यानंतर सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीमुळे नर्गिस दत्तनगर परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी ही आग विझवण्यात आली. तब्बल ४ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीमध्ये २ लहान मुलांसह ४ जण जखमी झाले आहेत. या आगीमध्ये ७० ते ८० झोपड्या जळून खाक झाल्या. आग लागल्यावर ७ ते ८ गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग सर्वत्र पसरली, असे स्थानिकांनी सांगितले.
आगीच्या घटनेवेळी घरामध्ये बाहेरून कडी लावलेल्या २ लहान मुलांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून रुग्णालयात पाठवले आहे. सैफउद्दीन (वय २ वर्ष) व उमेरा खातून (वय ७ वर्षे) अशी या दोन मुलांची नावे आहेत. या २ मुलांसह मानसिक धक्का बसलेल्या २ महिलांना उपचारासाठी पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नर्गिस दत्त झोपडपट्टीला २००४ साली मोठी आग लागली होती. या आगीमध्ये येथील सर्वच झोपड्या जळाल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी ७ ते ८ वेळा आग लागल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा
आग अटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. भाजप आमदार आशिष शेलार यांनी घटनास्थळाला भेट दिली. अनधिकृत मजल्यांवर कारवाईची मागणी आम्ही केली असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. तसंच अनधिकृत बांधकाम आगीच्या घटना घडण्यासाठी कारणीभूतचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.