विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नेते अभिजीत पानसे यांच्या मनमानीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला. गजानन काळे यांच्या राजीनाम्यानंतर काळे आणि जाधव समर्थक ‘कृष्णकुंज’वर आमनेसामने आले. त्यामुळे कृष्णकुंजवर काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान येत्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गजानन काळे यांनी पदाचा दिलेला राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
गजानन काळे यांचा ट्विटरवर आरोप
दरम्यान मनसेचे गजानन काळे यांनी ट्विट करत राजीनाम्याचे कारण सांगितले. त्यांनी ट्विट केले की, अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत आहे, असा आरोपच त्यांनी ट्विटमध्ये केला. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गजानन काळे यांनी राजीनामा सुपुर्द केला. काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे आमदार राजू पाटील आणि गजानन काळे यांसोबत बैठक घेतली. दरम्यान यावेळी कृष्णकुंजवर गजानन काळे आणि अविनाश जाधव यांचे समर्थक आमनेसामने आले.
हेही वाचा – भाजपा आहे म्हणून…; प्रियांका गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल
गजानन काळे यांचे पत्र
मनसेचे गजानन काळे यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांची नाराजी स्पष्ट होते. ते लिहितात की, नवी मुंबईत मनसे पक्षवाढीसाठी खूप प्रयत्न केले. दोन-तीन निवडणुका न लढतासुद्धा विधानसभा निवडणुकीत ५० हजार मतदारांचा विश्वास संपादित करु शकलो. पण काही पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर काही जणांनी अमित ठाकरे यांच्या थाळीनाद मोर्चाच्या एक दिवस आधीच राजीनामे दिले. त्यामुळे अमित ठाकरे यांचा मोर्चा अयशस्वी व्हावा यासाठीच त्यांनी राजीनामा दिला का? अशी शंका उपस्थित होते.
आदरणीय राजसाहेब, सदैव तुमच्यासोबत.
आजपासून मी 'लाखोंमधला एक' महाराष्ट्र सैनिक! pic.twitter.com/q5IXMXlVVH— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) December 13, 2019
महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करणार
दरम्यान राज ठाकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपुर्द केल्यानंतर गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणं मला शक्य नाही. पण एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी नेहमी कार्यरत राहणार आहे. माझा आपल्या नेतृत्वावर विश्वास आणि प्रेम आहे. त्यामुळेच मनसे सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही.”