जनलोकपालसह विविध मागण्यासांठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू केले आहे. बुधवारपासून पुकारलेल्या या आंदोलनाला आता मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ‘लोकपाल कायदा आणून पाच वर्षे झाली आणि पाच वर्षांनंतरही सरकार बहाणे बनवत आहेत. तरी, सरकारने अण्णांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात’, अशी मागणी करत आम्ही अण्णांच्या पाठीशी असल्याचं मुंबईच्या डबेवाल्यांनी म्हटलं आहे. मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी याबाबत डबेवाल्यांची भूमिका मांडली आहे. ”अण्णांनी प्रत्येकवेळी भ्रष्टाचाराविरोधात आणि जनलोकपाल आणि लोकायुक्त यासाठी उपोषणे केली आहेत. उपोषणाचा अण्णांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत असल्याने सरकारने सरकारने त्यांच्या सर्व मागण्या वेळीच मान्य कराव्यात”, अशी मागणी मुके यांनी केली आहे. ‘अण्णांचे वय बघता त्यांच्या प्रकृतीला धोका आहे. त्यामुळे सरकारने अण्णांच्या मागण्या मान्य करून त्यांचा जीव वाचवावा’, अशी विनंती आम्ही सरकारला करणार असल्याचे मुके यांनी स्पष्ट केले.
अण्णा हजारेंच्या उपोषणाला डबेवाल्यांचा पाठिंबा! #AnnaHazare #Mumbai #MyMahanagar pic.twitter.com/exvZx6hEIA
— My Mahanagar (@mymahanagar) January 31, 2019