मुंबईमध्ये सध्या गणेशमंडळांपुढे पालिकेने दिलेल्या नियमांचे पालन कसे करायचे असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. पालिकेने दिलेल्या नियमांचे पालन केल्यास गणेश उत्सव साजरा करणं कठीण जाईल असा सूर सध्या गणेश मंडळांकडून येत आहे. त्यामुळे पालिकेने अटी शिथिल करण्याची मागणी गणेश मंडळं करत आहेत. त्यामध्ये आता मनसेने गणेश मंडळांच्या बाजुने उभा राहण्याचा ठाण निर्णय घेतला आहे. याच संदर्भात ‘माय महानगर’च्या फेसबुक चर्चासत्रामध्ये बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना गणेश मंडळांकडून पैसे मिळत नाहीत म्हणून त्यांना आडकाठी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे
न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत पालिका अधिकारी गणेश मंडळांना आठकाठी करतात. नियमांवर बोट ठेवले जाते. मग हे नियमांचे पालन केवळ गणेश मंडळांच्या बाबतीच का? आमचे सण साजरे करताना नियमांची आडकाठी का? न्यायालयाने इतर देखील नियम आखून दिले आहेत. त्या नियमांचे देखील पालन झाले पाहिजे. मस्जिदीवरील भोंगे, हॉकर्स यांच्याबाबत देखील नियम आखून दिले आहेत. मग त्यावेळी नियम कुठे जातात? हॉकर्सकडून पैसे मिळतात. पण गणेश मंडळांकडून पैसे मिळत नाहीत. म्हणून मग नियमांवर बोट ठेवून गणेश मंडळांना आडकाठी केली जात आहे. असा गंभीर आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.