वावंढळ पुलावर अपघात सत्र !

वावंढळ पुलावर अपघात सत्र !

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वावंढळ पुलावर महिनाभरातील चौथा अपघात घडला असून, या मार्गावर टोल भरूनसुद्धा वाहनचालकांची सुरक्षा मात्र रामभरोसे आहे. आठवड्यापूर्वी गॅस टँकरचा घडलेला अपघात आणि पुलावर रस्त्याचा खचलेला भाग यानंतरही आयआरबी आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची उदासीनता कायम आहे. त्यामुळे गुरुवारी तेलाचा टँकर पुलावरून खाली कोसळला. सुदैवाने टँकर चालक अपघातून बचावला आहे.

खचलेल्या रस्त्यामुळे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. खोपोलीहून पनवेलच्या दिशेने जाताना वावंढळ येथील नाल्यावर हा पूल आहे. पुलाच्या आधी वळणदार रस्ता असल्यामुळे पुलाचा चालकाला अंदाज येत नाही. ओव्हरटेक करताना तेथे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. याची कल्पना असूनसुद्धा आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्याचाच परिणाम पुलावर रस्त्याला वीस फुटाची मोठी भेग पडली आहे. कोणत्याही क्षणी रस्ता खचून जीवघेणा अपघात घडू शकतो. याची कल्पना जाणकारांनी देऊनसुद्धा काम करण्याची तत्परता दाखविण्यात येत नाही. त्यामुळे अपघातसत्र सुरूच आहे.

आयआरबीचे वरिष्ठ अधिकारी मदन गांधी यांना पुलावर सातत्याने घडत असलेल्या अपघातांबाबत कायमस्वरुपी सुरक्षा उपाययोजनेबाबत विचारणा केली असता आयआरबीचा ठेका 10 ऑगस्टला संपत असल्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधा, असे उत्तर मिळाल्याने तेथील अभियंता सावंत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध न झाल्याने त्यांचे सहाय्यक दीक्षित यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करू, असे सांगितले.

First Published on: July 27, 2019 4:54 AM
Exit mobile version