नारायण राणेंना मंत्रीपद, शिवसेनेची कोंडी- भाजपचा नवा गेम

नारायण राणेंना मंत्रीपद, शिवसेनेची कोंडी- भाजपचा नवा गेम

नारायण राणेंची नवी भविष्यवाणी

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेला केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर आज झाला. यात तरुण, तडफदार व आक्रमक मंत्र्यांना मोदींनी संधी दिली असून ज्येष्ठ मंत्र्यांना नारळ दिले. त्यातही मोदींनी राज्यातील चार खासदारांना मंत्रीपद दिले आहे. पण राजकीय वर्तृळात चर्चा रंगली ती नारायण राणे यांच्या नावाची.

राणे यांची राजकीय प्रवास पाहता ते पूर्वाश्रमीचे चेंबूरचे शाखाप्रमुख होते ,नंतर १९८५ साली चेंबूरचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले, सलग तीनवेळा बेस्ट समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले तर १९९० साली कणकवली -मालवण मतदारसंघातून ते पहील्यांदा आमदार झाले. त्यांनतर १९९१ साली शिवसेनेचे आमदार ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेले नारायण राणे त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी होते. युती सरकारमध्ये पहील्यांदा दुग्ध विकास मंत्री , महसूल मंत्री आणि १ फेब्रुवारी १९९९ रोजी ते राज्याचे मुख्यमंत्री बनले.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ते सच्चे भक्त होते. राणे यांच्यातील आक्रमकता बघूनच त्यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बनवले होते. पण बाळासाहेबांनी पक्षाची धुरा २००२ साली उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्यानंतर राणे व उद्धव ठाकरे यांच्यात खटके उडायचे. पूर्वीची शिवसेना राहीली नाही.असे ते वारंवार बोलायचे. त्यावरून राणे व उद्धव ठाकरे यांच्यात वैचारिक मतभेद अधिकच वाढले. अखेर २००५ साली राणे शिवसेनेतून बाहेर पडले व काँग्रेसबरोबर त्यांनी हातमिळवणी केली. शिवसेनेत असताना आपल्याला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनता येईल. असे स्वप्न राणे पाहत होते. पण उद्धव ठाकरे यांच्याबरोबरील मतभेदामुळे राणे यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. पण त्यानंतर काँग्रेसकडूनही त्यांनी तिच अपेक्षा ठेवली. पण त्यांना राज्याचे उद्योगमंत्रीपद देण्यात आले. यामुळे राणे पुन्हा अस्वस्थ झाले. आपली ही घुसमट त्यांनी अनेकवेळा दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष सोनिया गांधीसमोरही मांडली. पण त्यांना प्रत्येकवेळा संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे काँग्रेसकडूनही निराशा झाल्याने २०१७ साली नारायण राणे यांनी स्वत;चा पक्ष काढला. स्वाभिमानी पक्ष असे त्याला नाव देण्यात आले. यादरम्यान, राणे व ठाकरे यांच्यात नेहमीच शाब्दीक वॉर सुरू होते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून ठाकरे शैलीत राणेंवर टीका करण्यात येते.. तर त्याच टीकेला त्याच भाषेत राणे उत्तर द्यायचे व देतात.

दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी व्याकुळ झालेल्या राणेंना स्वता;च स्वाभिमान पक्ष काढूनही काही करता आले नाही. यामुळे त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर २०१८ साली भाजपच्या पाठींब्यावर ते राज्यसभेत निवडून आले. नंतर २०१९ मध्ये राणे व त्यांची दोन्ही मुलं माजी खासदार निलेश राणे आणि आमदार निेतेश राणे भाजपवासी झाले. तेव्हापासून राणे व त्यांची दोन्ही मुलं शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. दरम्यानच्या काळात शिवसेना व भाजपमधले संबंधही ताणले गेले आहेत. याचपार्श्वभूमीवर राणे यांचा उपयोग कोकणात जम बसवण्यासाठी व शिवसेनेला आव्हान देण्यासाठी भाजप करणार हे निश्चित आहे. राणे कोकणातील असून रत्नागिरी व सिंधुदुर्गात त्यांचा दबदबा आहे. कोकणवासियांसाठी राणे हे दैवत असल्याने त्याचाच फायदा भाजप नक्की घेणार हे राणेंना मंत्रीपद देऊन आज भाजपने अधोरेखीत केले आहे.

First Published on: July 7, 2021 9:21 PM
Exit mobile version