लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना हवाई प्रवासात कोरोना चाचणीतून सवलत द्या; पालिका आयुक्तांचे मुख्य सचिवांना पत्र

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना हवाई प्रवासात कोरोना चाचणीतून सवलत द्या; पालिका आयुक्तांचे मुख्य सचिवांना पत्र

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना हवाई प्रवासात कोरोना चाचणीतून सवलत द्या

मुंबईमधून अद्याप कोरोना हद्दपार झालेला नाही. त्यामुळे मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या व मुंबईतून इतरत्र नियमित जाणाऱ्या नागरिकांना विमान प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी, ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना आरटी-पीसीआर चाचणीतून सवलत देण्यात यावी, अशी विनंती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या विनंतीबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन हिरवा कंदील दर्शवल्यास नियमित विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आयुक्तांच्या या विनंतीपत्रामुळे आता लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांनाही रेल्वे प्रवास करण्यासाठी सवलत देण्याबाबत करण्यात येत असलेल्या मागणीला जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात देशातील दिल्ली, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, कोलकाता आदी भागातून अनेक नागरिक ये-जा करत असतात. तसेच मुंबईतून सदर राज्यात अनेकजण हवाई प्रवास करतात. त्यामुळे त्यांना या कोरोनाच्या कालावधीत आरटी-पीसीआर चाचणी करावी लागते.

आता लसीकरण मोहीम जोमात सुरु असल्याने अनेकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे अशा नियमित हवाई प्रवास करणाऱ्या नागरिकांना सकाळी जाऊन संध्याकाळी परतत असताना सदर चाचणी करणे त्रासदायक वाटते. मात्र, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना नियमित हवाई प्रवासात ४८ तासांच्या आरटी-पीसीआर चाचणीमधून सवलत देण्याची विनंती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

First Published on: July 13, 2021 10:58 PM
Exit mobile version