मुंबईत करोनाच्या बळींची संख्या ५

मुंबईत करोनाच्या बळींची संख्या ५

कोरोना व्हायरस

 

राज्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२५ झाली असून एका दिवसांत पुन्हा एकदा ३ नवीन रुग्णांची भर झाली आहे. तर, मृतांचा आकडा ५ वर पोहोचला आहे. यात सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, करोनामुळे आणखी एका महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाय, एकूण जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुण्यातील ५ , मुंबईतील १२ आणि संभाजीनगरमधील येथील एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात ६४९ करोनाग्रस्त रुग्ण असून त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४३ रुग्ण बरे झाले आहेत.

या तीन नवीन रुग्णांमध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍या एका ६५ वर्षीय महिलेने टंडन हॉस्पिटल, डी.वाय.पाटील हॉस्पिटल अशा दोन हॉस्पिटलमधून उपचार घेतले. त्यानंतर, वाशी येथील जनरल हॉस्पिटलमध्ये २४ मार्चला अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली. त्याच दिवशी रात्री या महिलेचा मृत्यू झाला. ती करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन बुधवारी स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.

आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गत करोनाग्रस्त रुग्ण आढळला असून त्याला सहवासाने संसर्ग झाला आहे. त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता पण, त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही. मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

गुरुवारी संध्याकाळ सदर महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर अल्पवधीतच त्या महिलेचा मृत्यू झाला. नेमके कारण आम्ही तपासत आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरातील १५ करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात गुरुवारी एकूण २६९ जण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३ हजार २४३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २हजार ७५० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

First Published on: March 27, 2020 7:06 AM
Exit mobile version