‘सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने ‘वर्षा’वर मोर्चा काढावा’

‘सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने ‘वर्षा’वर मोर्चा काढावा’

'राजीनामा धक्कादायक'; चव्हाणांच्या पक्षप्रवेशावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले, माझ्याशी बोलणं झालं...

वीमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे शिवसेनेने मंगळवारी याविरोधात मुंबईत विराट मोर्चा काढला. सध्या या मोर्चाविरोधात विरोधी पक्षाचे नेते टीका करत आहेत. ‘एकीकडे सत्ता उपभोगायची आणि पीक विम्यासाठी मोर्चा काढायचा हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असून त्यांना खरोखर शेतकऱ्यांची चिंता असेल आणि त्यांची हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढावा,’ असे आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला केले. या मोर्चासंबंधी पत्रकारांसोबत संवाद साधतांना ते आपल्या शासकिय निवासस्थानी बोलत होते.

केवळ मतासाठी या मोर्चाचा देखावा केला

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘शिवसेनेने मुंबईत काढलेल्या मोर्चात एकही शेतकरी नाही. त्यांना शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढायचा होता. तर जिकडे शेतकरी आहे तिकडे काढायला पाहिजे होता. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतासाठी या मोर्चाचा देखावा केला. सत्तेत राहून शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत. तुम्ही मग मोर्चे काढून मागणी करता कोणाकडे?, असा सवाल त्यांनी केला. पीक विम्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याऐवजी त्यांचे मंत्री अधिवेशनात गप्प बसतात आणि आता मोर्चासारखी नौटंकी करतात. सत्तेत राहून प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्तेला लाथ मारा आणि मग रस्त्यावर उतरा,’ असे आवाहनही यांनी शिवसेनेला केले.

शेतकऱ्यांचा काढलेला मोर्चा ही शिवसेनेची निव्वळ दुटप्पी भूमिका

पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक कशी करतात शेतकऱ्यांना लुबाडून स्वतःचे खिसे कसे भरतात हे पुराव्यानिशी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारच्या निर्दशनाला आणून दिले. तेव्हा शिवसेनेचा एकही मंत्री बोलला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढलेला मोर्चा ही शिवसेनेची निव्वळ दुटप्पी भूमिका आहे. शिवसेनेला शेतकऱ्यांचा खरेच कळवळा असता तर सत्तेचा आसूड वापरून पीकवीमा कंपन्यांना सरळ केले असते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असता, परंतु यांना शेतकऱ्यांच्या हिताशी काही देणेघेणे नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.

पीकविमा कंपन्यांचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. केंद्रातही शिवसेना सत्तेत सहभागी आहे. आता संसदेचे अधिवेशन सुरु आहे. शेतकऱ्यांना नाडवणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्यास शिवसेना केंद्र सरकारला भाग पाडू शकते, त्यासाठी त्यांच्या हातात संसदीय आयुधे आहेत. मात्र प्रत्यक्ष या प्रश्नी कोणताही मुद्दा, निषेध किंवा चर्चा संसदेत केली नसून केवळ लोकभावनेशी शिवसेना खेळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

First Published on: July 17, 2019 6:11 PM
Exit mobile version