रब्बी हंगामात अखंडित वीजपुरवठा सुरू राहणार – ऊर्जामंत्री

रब्बी हंगामात अखंडित वीजपुरवठा सुरू राहणार – ऊर्जामंत्री

येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी सुरळीत वीजपुरवठा आणि ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याबाबत कायम दक्षता घ्यावी,असे आवाहनही ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले.

ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगडला ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी पहिल्यांदा भेट दिली. या भेटी दरम्यान प्रकाशगड येथे आयोजित बैठकीत परतीच्या पावसामुळे राज्याच्या काही भागात झालेल्या वीजयंत्रणेच्या नुकसानीचा आढावा तसेच राज्यभरातील वीजपुरवठ्याची स्थिती तसेच इतर विविध मुद्द्यांवर बैठक घेतली. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. असीमकुमार गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय खंदारे, एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे सल्लागार श्री. उत्तमराव झाल्टे तसेच चारही वीज कंपन्यांचे संचालक उपस्थित होते. या बैठकीस राज्यभरातील सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक तसेच मुख्य अभियंता हे व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सहभागी झाले होते.

ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी सांगितले की, कोविड-19 मुळे वीजक्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. वीजबिलांची वसुली अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. एकीकडे महसुलात घट होताना दुसरीकडे ‘निसर्ग’ चक्रीवादळ, अवकाळी मुसळधार पाऊस व परतीच्या पावसाची अतिवृष्टी यामुळे यंदा राज्यभरातील वीजयंत्रणेला मोठे तडाखे बसले आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व दर्जेदार ग्राहकसेवा देणे ही प्राथमिक जबाबदारी व कर्तव्य आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी वीजयंत्रणा नेहमी पाण्याखाली जाते, त्याचा अभ्यास करून भविष्यात असे प्रकार घडणार नाही अशा उपाययोजनांचा आराखडा तयार करून लगेचच या कामास सुरवात करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यासोबतच अतिवृष्टीमधील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी किंवा साहित्याची आवश्यकता असल्यास ती त्वरीत पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त स्वरुपात रोहित्र उपलब्ध करून ठेवावेत. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार ऑईल व इतर साहित्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत असल्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

राज्यातील प्रामुख्याने नऊ जिल्ह्यांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सहा गावांमध्ये सध्या वीजपुरवठा उपलब्ध नाही. तसेच सात उपकेंद्रामध्ये पाणी साचले असल्याने ते बंद आहेत. मात्र युद्धपातळीवर दुरुस्ती कामे व पर्यायी व्यवस्थेतून उर्वरित सर्व ठिकाणी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झालेला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सद्यस्थितीत वीजपुरवठ्यासंबंधी वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरु असून पावसाच्या पाण्याच्या निचरा झाल्यानंतर कृषिपंपांचा वीजपुरवठा टप्पाटप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तमराव झाल्टे यांनी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीबाबत संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये संबंधीत कंपन्यांसमोर येत्या कालावधीमध्ये येणारी आव्हाने व त्यावरील तांत्रिक, प्रशासकीय व ग्राहकाभिमुख सेवा व उपाययोजना आदींची सविस्तर माहिती देण्यात आली.


 

First Published on: October 20, 2020 6:09 PM
Exit mobile version