Aanilराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई लोकल सेवा सुरू करण्यावरून रेल्वे प्रशासनाला चांगलंच सुनावलं आहे. मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावं असं, अनिल देशमुख म्हणाले. यामध्ये कोणतंही राजकारण करू नये असंही त्यांनी खडसावलं आहे. यावेळी राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेला वेळापत्रक सुचवलं असल्याचंही अनिल देशमुखांनी यांनी सांगितलं.
कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लोकल सेवा सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला तसंच काही ठराविक प्रवाशांसाठी सुरु आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंबंधी विनंती करणारं पत्र देखील रेल्वेला पाठवलं आहे. या पत्रात राज्य सरकारने प्रवासासाठी तयार केलेलं वेळापत्रक देखील जोडलं आहे.
मात्र, राज्य सरकारच्या पत्रानंतर रेल्वेकडून मुंबई लोकल सुरु करण्यामध्ये असमर्थता दर्शवत अडचणींचा पाढा वाचून दाखवला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांनी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला सहकार्य करावं अशी विनंती केली आहे. “जर रेल्वेने सहकार्य केलं तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यामुळेच कोणतंही राजकारण न करता रेल्वेने सहकार्य करावं,” असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे.