चांदिवलीमध्ये इमारतीला लागून असलेला रस्ता १० फूट खचला!

चांदिवलीमध्ये इमारतीला लागून असलेला रस्ता १० फूट खचला!

असा खचला चांदिवलीत रस्ता

नुकत्याच सुरु झालेल्या पावसाळ्यानं मुंबईकरांना दोनच दिवसांत हैराण करून सोडलं असून सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना तुफान पावसाचा सामना करावा लागत आहे. थेट मुंबईकरांचाच सामना यासाठी कारण प्रशासन फक्त ‘मॉनिटरिंग’च्या नावाखाली न केलेल्या उपाययोजनांची जबाबदारी टाळू पाहात असताना हाल सोसावे लागत आहेत ते मुंबईकरांना! मध्यरात्री मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळल्यामुळे आतापर्यंत १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापाठोपाठ आता चांदिवलीच्या संघर्ष नगर परिसरामध्ये इमारत क्रमांक १० समोरचा रस्ता तब्बल १० फूट खचल्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात

संघर्षनगर परिसरातला हा रस्ता इमारत क्रमांक १०ला लागूनच आहे. त्यामुळे पावसामुळे रस्त्याचं अधिक नुकसान झाल्यास इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी परिस्थिती सध्या तिथे निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क होत नागरिकांना तिथून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. आसपासच्या काही इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सध्या सुरू असून तेथील परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जण ठार

प्रशासनावर स्थानिकांची नाराजी

मात्र, असं असलं तरी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाला दोष दिला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी शापूरजी पालनजी या बिल्डरचं बांधकाम सुरू आहे. त्याच ठिकाणी बऱ्याच झोपड्या देखील आहेत. काही वर्षांपर्वी अशाच पद्धतीने रस्ता खचला होता. मात्र, त्यावेळी मोठी दुर्घटना टळली होती. स्थानिकांकडून या मुद्द्याकडे वारंवार लक्ष वेधून देखील त्याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.

First Published on: July 2, 2019 10:22 AM
Exit mobile version