हे तर भाजपचे अपयशपत्र

हे तर भाजपचे अपयशपत्र

भाजपचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ, काँग्रेसची आशिष शेलारांवर टीका

भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राच्या निवडणुकीकरिता जाहीर केलेले संकल्प पत्र हे भाजपचे ‘अपयश पत्र’ आहे. जाहीरनाम्याला जुमलानामाचे स्वरूप भाजपने दिलेले आहे, याचेच हे प्रतिक आहे. भाजपा हा जनतेच्या भावनांशी खेळ खेळत असून विश्वासघातकी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपच्या दृष्टीने जाहीरनाम्याचा उपयोग हा जनतेला फसवण्यासाठीच असतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे २०१९ चा जाहीरनामा छापण्याकरिता द्रविडी प्राणायम करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. त्याऐवजी पाच वर्षापूर्वीचे व्हिजन २०२० पुन्हा छापले असते तरी चालले असते. व्हिजन २०२० मधील बहुतांश आश्वासने भाजपच्या संकल्प पत्रात पुन्हा दिली आहेत. प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी, प्रत्येक गाव इंटरनेटद्वारे जोडणार, पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ही गेल्या पाच वर्षात दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत हे पाहता मुख्यमंत्र्यांनी व्हिजन २०२० कडे पाच वर्षात ढुंकूनही पाहिले नाही हे स्पष्ट होते असे सावंत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक वीटही अद्याप लागली नाही. भाजपने या महान विभूतींच्या नावाने राजकारण केले असून लोकांची फसवणूक केली आहे. एमएमआर रिजनमध्य सॅटेलाईट टाऊन तयार करणार होते, ट्रान्सहार्बर सी लिंक, कोस्टल रोड, बहुमजली रस्त्यांचे जाळे गोरेगाव मुलुंड लिंक रोड, धारावीचा पुर्नविकास पूर्व पश्चिम कॉरिडॉर, मुंबईला स्मार्ट सिटी बनवणे, प्रत्येक महानगरपालिकेच्या शहरांना स्मार्ट सिटी बनवणे ही आश्वासने भाजपाने पाच वर्षापूर्वी दिली होती. यामधील एकही आश्वासन पूर्ण झाले नाही,असेही सावंत म्हणाले.

First Published on: October 16, 2019 1:36 AM
Exit mobile version