भिवंडी शहरातील आजमीनगर भागातील जहाना हॉटेललगत राहत असलेली १५ वर्षीय शाळकरी मुलगी शाळेत जाते, असे सांगून घरातून बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. फलक मुबारक खान (१५ ) असे बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. मुलीची आई शमीनाबानो खान (३२ ) हिने भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्दन जाधव करीत आहे.
नेमके काय घडले?
भिवंडीच्या पालिकेच्या शाळेत फलक मुबारक खान दहावीच्या वर्गात शिकत आहे. शनिवारी ती नेहमीप्रमाणे शाळेत जाते, असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, ती उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिचा शाळेत, नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेण्यात आला. मात्र, शोध घेऊन देखील फलक सापडली नाही. त्यामुळे तिची आई शमीनाबानो खान हिने मुलगी हरवल्याची भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जनार्दन जाधव त्या मुलीचा शोध घेत आहेत.