पुतळे, स्मारकांची विटंबना करणाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या धर्तीवर कारवाई

पुतळे, स्मारकांची विटंबना करणाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या धर्तीवर कारवाई

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत सध्या राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे तसेच भारताचे संविधान यांचा कोणत्याही प्रकारे अवमान करणार्‍या व्यक्तींच्या विरोधात दलित अत्याचारविरोधी कायद्याच्या धर्तीवर अजामीनपात्र गुन्हा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेना नगरसेवक आणि महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे ही मागणी करत यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय आणि सामाजिक पातळीवर अतिशय काळजीपूर्वक आणि पुरेशा दक्षतेने या पुरातन वास्तूंचे जतन करण्यात येते. तसेच जगातील सर्वांत मोठी आणि सशक्त लोकशाही हे बिरुद सार्थ करणार्‍या भारत देशाचे संविधान हे एकमेवाद्वितीय असे लिखित संविधान आहे. परंतु काही वेळा समाजविघातक प्रवृत्ती, भारताचे संविधान, राष्ट्रध्वज इत्यादींचा अवमान करणारे निंदनीय कृत्य करतात. त्यामुळे देशातील शांतता, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते. इतकेच नव्हे तर जातीय तसेच धार्मिक विद्वेष पसरुन जनसामान्यांच्या जीविताला आणि मालमत्तेस तसेच राष्ट्रीय संपत्तीस हानी संभवते. परिणामी वैश्विक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याने, राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे तसेच भारताचे संविधान यांच्या कोणत्याही प्रकारे अवमान करणार्‍या व्यक्तींच्या विरोधात दलित अत्याचारविरोधी कायद्याच्या धर्तीवर अजामीनपात्र गुन्हा करण्यासाठी एक स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वार केली आहे.

भारत देशास विविध परंपरा, रुढी आणि उच्च सांस्कृतिक वारसा लाभला असून त्यांची श्रीमंती कथित करणोर राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे आणि राष्ट्रीय स्मारके यांच्यासारख्या अनेक ऐतिहासिक पुरातन वास्तू भारताच्या मर्मबंधातील ठेवी असल्याचे जाधव यांनी नमुद केले आहे.

First Published on: November 20, 2019 10:19 PM
Exit mobile version