‘उडालेल्या कावळ्यांना इतर पक्षाच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते?’

‘उडालेल्या कावळ्यांना इतर पक्षाच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते?’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सध्या शिवसेना भाजपामध्ये आयारामांचे प्रमाण मोठ्या असून, याचा सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसत आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी नुकतीच ‘चिंता करू नकाउडाले ते कावळे अशी जोरदार टीका केली होती. मात्र आता शरद पवार यांच्या याच वक्तव्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता’, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाहीत. तसेच कधी कधी राजकारणात मजबुरी म्हणूनही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या धोरणाने वागावे लागते. मग ते कावळे काय आणि राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात, अशी टीका देखील सामनातून करण्यात आला आहे.

काय आहे अग्रलेखात 

जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळ्यांच्या जोरावर पक्षबांधणी करू, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, चारा, वैरण खाऊन या कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले. असे अनेक कावळे शिवसेनेतून उडून गेले. तेव्हा ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ या मंत्रावर शिवसेना उभी राहिली. कारण शिवसेनेत बाळासाहेबांनी घडवलेले मावळे हे जमिनीवरच राहिले. त्यामुळे २०१४ च्या ‘मोदी’ लाटेतही याच मावळ्यांनी किल्ला लढवला व भगवा राखला. हा बाणा आजही शिवसैनिकांनी जपला आहे. तशी परिस्थिती काँगेस किंवा राष्ट्रवादीची आहे काय? मुळात या दोन्ही पक्षांना काही विचार, धोरण आणि दिशा उरली आहे काय? ३७० कलम हटवले म्हणून साऱ्या देशात आनंदी आनंद असताना ‘३७०’च्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादीने उभे राहणे हे कसले धोरण? त्यामुळे काँग्रेस पक्षालाही गळतीच लागली. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सरकार बनविण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेच होते. हा चोंबडेपणा करण्याची तशी गरज नव्हती. राष्ट्रवादीच्या कावळय़ांनी तेव्हा ही फालतू ‘काव काव’ केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते, पण पवारांनी २०१४ मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगीत आहे. आपल्या अस्सल इरसाल कोकणी भाषेत बोलायचे तर ‘केले तुका आणि झाले माका!’ अशीच आज राष्ट्रवादीची स्थिती आहे. शिवसेना किंवा भाजपात कावळे येत आहेत की मावळे याचा निर्णय आम्ही घेऊच. ‘चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी एक कटुसत्य सांगितले होते. सत्ता आहे म्हणून ‘आयाराम’ म्हणजे ‘इनकमिंग’ वाढले आहे. या ‘आयारामा’त कावळे किती आणि मावळे किती याचाही शोध आम्ही घेतच असतो. वाल्यांचे वाल्मीकी करणारे वॉशिंग मशीन तसे कुणाकडेच नाही. कधी कधी राजकारणात मजबुरी म्हणूनही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या धोरणाने वागावे लागते. मग ते कावळे काय आणि राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात. महाराष्ट्रात ‘युती’ला जिथे गरज आहे तिथे नव्या मावळ्यांचे स्वागत होईल.

काय म्हणाले होते शरद पवार 

अनेक लोक पक्ष सोडत आहेत. मात्र जे खटल्यात आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. “कावळ्यांची चिंता करायची नाही, तर मावळ्यांची चिंता करावी” अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

हेवाचा – खटले असलेले कावळे गेले, स्वच्छ मावळे उरले – शरद पवार

First Published on: August 20, 2019 9:34 AM
Exit mobile version