csmt bridge collapse – ‘सरकार पाच लाखात मृत्यू विकत घेत आहे’

csmt bridge collapse – ‘सरकार पाच लाखात मृत्यू विकत घेत आहे’

'सरकार पाच लाखात मृत्यू विकत घेत आहे'

‘माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाचा मृत्यू झाला आणि मी काहीच करु शकलो नाही’ असे सांगत सिराज खान यांनी हंबरडा फोडला. गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सिराज खान यांचा ३२ वर्षीय मुलगा जाहीद खान यांचा मृत्यू झाला. आज पत्रकारांशी बोलताना सिराज खान म्हणाले की, ‘साहेब, मी माझा मुलगा गमावला आहे. सरकारच्या पाच लाख रुपये देण्याने माझा मुलगा मला परत थोडी मिळणार आहे? सरकार पाच लाखात मृत्यू विकत घेत आहे, ५० हजारांमध्ये जखमी विकत घेत आहे’, असे सिराज खान म्हणाले आहेत.

‘माझ्यासमोर माझ्या मुलाने प्राण सोडला’

घाटकोपरच्या दामोदर पार्क येथे राहणारे सिराज खान यांचे घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ कमरेच्या चामडी पट्ट्याचे दुकान आहे. बुधवारी दुपारी सिराज खान आपला मुलगा जाहीद (३२) यांच्यासह क्रॉफर्ड मार्केट येथे दुकानासाठी लागणारा चामडी पट्ट्याचा माल आणि बक्कल खरेदी करण्यासाठी गेले होते. माल खरेदी करून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते मुलासह सीएसटीएम रेल्वे स्थानकाकडे घरी जाण्यासाठी निघाले होते. दुर्घटनाग्रस्त पुलावरून जात असताना गर्दी असल्यामुळे जाहीदने त्यांना ‘पापा साईड से चलिये’ नही तो किसी का धक्का लग जायेगा’, असे सांगितले. ‘तेवढ्यात काही कळण्याच्या आत आम्ही दोघे पुलावरून खाली कोसळलो, सर्वत्र मातीचा धुराडा उडाला होता, जखमी झालेल्याचा आक्रोश, किंचाळ्या ऐकू येत होत्या. मी कसाबसा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मला उठता येत नव्हते. त्यातही मी माझ्या जाहिदला शोध घेत होतो. जाहीद हा माझ्यापासून काही अंतरावर पडला होता. तो पूर्ण रक्ताने भरला होता, मी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मला उठता येत नव्हते. अखेर आम्हाला रुग्नालयात आणले आणि तिथे माझ्या मुलाने प्राण सोडला. माझ्यासमोर माझ्या मुलाने प्राण सोडला आणि मी काहीच करू शकलो नाही’, असे सिराज खान सांगत होते. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते अजूनही सावरले नव्हते.

जाहीदला दोन लहान मुली

जाहीद सिराज खान याला दोन मुली असून एक मुलगी ८ महिन्याची तर दुसरी ५ वर्षाची आहे. सिराज खान यांचे घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ कमरेच्या चामडी पट्ट्याचे दुकान आहे. या दुकानाची सर्व जवाबदारी जिहाद याच्यावर होती. संपूर्ण घरातील आर्थिक बाजू देखील जाहीदच सांभाळत होता, असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे आहे. शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे असे विचारले असता ‘मुझे सरकार पर भरोसा नही है, मुक्त मे सब मारे गये, असे ते म्हणाले. सरकार पाच लाखात मृत्यू विकत घेत आहे, ५० हजारात नागरिकांना जखमा देत आहे, असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या जाहीदचे वडील सिराज खान हे पत्रकारांशी बोलत होते. या दुर्घटनेत जाहीदच्या मृत्यूचे वृत्त घाटकोपर येथील व्यापाऱ्यांमध्ये पसरताच गुरुवारी रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदारांनी एका दिवस दुकाने बंद ठेऊन जाहिदला श्रद्धांजली वाहिली.

First Published on: March 15, 2019 9:57 PM
Exit mobile version