मोबाईल टॉवरबाबत कारवाई करा

मोबाईल टॉवरबाबत कारवाई करा

Mobile Tower

वसईच्या पूर्वपट्टीतील मोबाईल सेवा गेल्या पाच दिवसांपासून ठप्प झाली आहे. येथील मोबाईल टॉवर अन्यत्र हलवण्याची मागणी माजी खासदारांनी तहसीलदारांकडे केली आहे.दूरध्वनी सेवा बंद झाल्यानंतर पूर्वपट्टीतील ग्रामस्थांचे संपर्काचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल सेवा आहे. भर पावसात येथील गावांचा इतर संपर्क तुटतो. त्यावेळी मोबाईलचा त्यांना मोठा आधार असतो. हाच आधार गेल्या पाच दिवसांपासून तुटला आहे. त्यामुळे शिरवली, पारोळ, घाटेकर, सायवन,चाळीसगांव, आंबोडे, भिनार, मेढे, वडघर, कळंभोण, साखरपाडा, प्लाटपाडा, इनामपाडा, आडणे या गावातील जनसंपर्क तुटला आहे. वोडाफोन, आयडीया, जिओ, बीएसएनएल या कंपन्यांचे टॉवर नदीकिनारी असल्यामुळे त्यांच्या कॅबिनमध्ये पाणी शिरले आहे. परिणामी ही सेवा ठप्प झाली आहे. हे टॉवर इतरत्र हलवून मोबाईल सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार बळीराम जाधव यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

First Published on: August 10, 2019 1:02 AM
Exit mobile version