अतिवृष्टीच्या काळात ज्या सखल भागांमध्ये पाणी साचते, त्याठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच याबाबत 8 तारखेपर्यत अहवाल सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या काळात सार्वजनिक विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, नाले आणि मलःनिस्सारण विभागाने तीन पाळ्यांमध्ये 24 तास कार्यरत राहण्याच्या सूचनाही जयस्वाल यांनी दिल्या आहेत.
काय म्हणाले आयुक्त?
गेले तीन दिवस ठाणे शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या, वृक्ष पडण्याच्या तसेच शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जयस्वाल यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेवून या काळात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेतला. दरम्यान सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांनी पुन्हा नव्याने स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रभाग समितीमध्ये फिरून पाहणी करावी जेणेकरुन भविष्यात कुठलीही दुर्घटना घडणार नाही, असे जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.