गरीब नागरिकांना मदत हेच खरे जीवन असे घोषवाक्य मनात घेऊन, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानने मागील तीन वर्षांपासून सुरू केलेल्या एक हात मदतीचा हे घोषवाक्य आज सर्वत्र होत असून सर्व सामाजिक संघटना गरिबांच्या मदतीकरिता सरसावत आहेत. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने शहापूर तालुक्यातील पारोला या गावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कुटुंबाना दीपावली निमित्त कपडे, शालेय उपयोगी वस्तू, खाऊ मदत देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अमित मोकाशी, सचिव रोशन कदम, खजिनदार सूरज कदम, रोहित शिगवण, राकेश कुंभार, अश्विनी कुंभार, ओमकार बहाडकर, संतोष पांडे, विकास वेखंडे आदी उपस्थित होते.
पारोला गावत पाण्याची व्यवस्था नाही
यावर्षी दिवाळी भेट म्हणून शहापूर येथील तानसा धरण अभयारण्यातील पारोला या आदिवासी गावातील ३६ कुटुंबांना दिपावली निमित्त कपडे, मुलांना शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या. आमचे गाव तानसा धरणाच्या बाजूला असून देखील आमच्या गावी पिण्याकरिता पाणी नाही. लाईटचे कनेक्शन आहे पण
ट्रान्सफार्मर येथील विद्युत डीपी चोरीला गेला आहे. यामुळे यंदाची दिवाळी आमची अंधारात साजरी होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. आपण आमच्या गावातील समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न करा असे ग्रामस्थ नागरिकांनी प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम प्रसंगी सांगितले. पारोला गावात जाण्यासाठी रस्ता नसून पायवाट आहे. गावाच्या बाजूलाच मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारे ब्रिटिश कालीन तानसा धरण असून देखील गावात पिण्याचे पाणी नाही, ही मोठी चिंतेची बाब असून आपल्या गावातील समस्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल कदम यांनी ग्रामस्थांना कार्यक्रम प्रसंगी आश्वासन दिले. घनदाट जंगल परिसरात आम्हाला मदत म्हणून आपण आलात यामुळे प्रतिष्ठाणच्या सर्व पदाधिकारी यांचे पारोला ग्रामस्थानि आभार मानले.
प्रतिष्ठानच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी पाड्याची दिवाळी उजेडात
प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत ६७ इतिहास कालीन गडकिल्यावर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण मोहीम घेण्यात आल्या आहेत. तसेच युवक, युवतींना प्रत्यक्ष गडकिल्ले दाखवून अभ्यास दौरे देखील करण्यात आले आहेत. तसेच गोर, गरिबांना मदत हेच खरे जीवन असे घोषवाक्य मनात घेऊन दरवर्षी दीपावली निमित्त आदिवासी कुटुंबाना दिवाळी भेट देण्यात येते. मागील वर्षी माहुली किल्ला जवळील जुनावना पाडा येथे दिपावली निमित्त भेट वस्तू देण्यात आल्या होत्या. मोटारसायलकच्या लाईटवर तसेच मोबाईल टॉर्च लावून दिवाळी भेट नागरिकांना देण्यात आली होती. त्यावेळी गावात लाईट नसल्याची बाब गावातील नागरिकांनी प्रतिष्ठानकडे कळवली होती. यासंदर्भात जुनावना पाडा परिसरातील स्थानिक खासदार आणि महावितरण अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. अखेर महावितरणने गावात विद्युत मीटर लावून लाईटची व्यवस्था केली.