सेनेच्या पाठिंब्याबाबत दिल्लीत हायकमांड निर्णय घेतील

सेनेच्या पाठिंब्याबाबत दिल्लीत हायकमांड निर्णय घेतील

महायुतीला स्पष्ट कौल देऊनही राज्यपाल सत्तास्थापनेसाठी का बोलावत नाही, राज्यपालांना देखील दबावाखाली काम करावे लागत आहे का? असा संशय आता यानिमित्ताने निर्माण झाला असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ठाण्यात केले आहे. तब्बल 15 दिवस जनतेने कौल देऊनही, सत्ता का स्थापन होत नाही? आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करणे ही महायुतीचीच जबाबदारी असल्याचे यावेळी सचिन सावंत यांनी सांगितले. सावंत यांनी ठाण्याच्या वुडलँड हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दल दिल्लीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, त्याच निर्णयाचे पालन होईल. असे सावंत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे राजकारण विखारी, जनहित विरोधी आणि जनतेची दिशाभूल करणारे असल्याची टीका त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी त्रास सहन करावा लागत आहे. असेही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देश पातळीवर काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनाची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आर्थिक पातळीवर घसरण सुरू आहे. ग्राहकाची खरेदी क्षमता घटली आहे. खाजगी गुंतवणूकदार गुंतवणूक करत नाहीत. आयात-निर्यातीमधील दरी वाढली आहे. तर सरकारी गुंतवणूक होत नसल्याचं सावंत यांनी सांगितले.

First Published on: November 8, 2019 1:22 AM
Exit mobile version