कोणत्याही परिस्थितीत उद्योग सुरूच ठेवणार – मराठी तरुणांचा निर्धार

कोणत्याही परिस्थितीत उद्योग सुरूच ठेवणार – मराठी तरुणांचा निर्धार

लॉकडाऊन झाल्यानंतर परप्रांतिय मुंबई सोडून आपल्या मूळ गावी गेले. याचवेळी मुंबईतील मराठी तरुणांनी पुढाकार घेत भाजी, कपडे यापासून मासळी विक्रीपर्यंतचे ऑनलाईन व्यवसाय सुरू केले. मात्र आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने अनेक परप्रांतिय पुन्हा मुंबईत परतू लागले आहे. त्यामुळे भाजी व मासळी विक्री करणार्‍या मराठी तरुणांसमोर पुन्हा एकदा भैय्यांचे आव्हान उभे राहिले आहे. परंतु आता मिळालेली संधी दवडायची नाही, आम्ही सक्षमपणे व्यवसाय करू शकतो. हे दाखवून देण्याचा निर्धार मराठी तरुणांनी केला आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरिकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यातच मुंबईतील भैय्ये, बंगाली हे आपल्या गावी गेल्यामुळे मुंबईकरांना भाजी व मासळी मिळणे अवघड झाले होत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतील अनेक मराठी तरुण रस्त्यावर उतरून भाजी व मासळी विक्री करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी ऑनलाईन विक्री सुरू केली. ताजी व स्वस्त: मासळी तरुण ऑनलाईनच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहचवू लागले. नागरिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र आपल्या गावी गेलेले परप्रांतिय भैय्ये काही दिवसांपासून मुंबईमध्ये पुन्हा परतू लागले आहेत. या भैय्यांनी मुंबई पुन्हा येताच आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी डोक्यावर मोठे घमेले घेऊन दारोदारी जाऊन मासळी विकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच प्रत्यक्ष समोरच मासळी असल्याने व ऑनलाईनच्या तुलनेत स्वस्त असल्याने भैय्यांकडून मासळी घेण्यास प्राधान्य देण्यात येऊ लागले आहे. परिणामी पुन्हा एकदा मासळी व्यवसायामध्ये मराठी तरुणांसमोर भैय्यांचे आव्हान उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. या आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्याचा निर्णय मराठी तरुणांनी घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही ऑनलाईन मासळी विक्री करण्यासा सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला दिवसाला १० ते १५ ऑर्डर येत होत्या. पण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर भैय्ये डोक्यावर पाटी घेऊन घरोघरी जाऊ लागल्याने आमच्या ऑर्डर दोन ते तीन वर आल्या आहेत. आम्ही समुद्रातून आलेली ताजी मासळी ग्राहकांना देतो, तर भैय्यांकडून दोन ते तीन दिवस बर्फामध्ये ठेवलेली मासळी विकली जाते. त्यामुळे तिचा भाव कमी असल्याने आम्हाला फटका बसू लागला आहे. मराठी तरुण उद्योग करू शकत नाही हा समज दूर करण्यासाठी आम्ही लॉकडाऊनमध्ये सुरू केलेला ऑनलाईन व्यवसाय कायम ठेवण्यासाठी नवी पद्धतींचा वापर करणार आहोत. व्यवसायाच्या पद्धतीत बदल करून या आव्हानाचा आम्ही सामना करू असे ऑनलाईन मासळी विक्री करणार्‍या सुशान खोत या तरुणाने सांगितले.

लॉकडाऊन आमच्या नोकर्‍या गेल्या. त्यातच परप्रांतिय मुंबई सोडून गेल्याने आम्हाला व्यवसायाची संधी मिळाली. सरकारच्या निर्बंधाचे पालन करत व्यवसाय करताना आम्हाला पोलिसांचा मारही खावा लागला. आम्ही मासे साफ व पॅकिंग करून ग्राहकाला देतो. भैय्ये आल्याने आम्हाला फटका बसत आहे. सरकारने बेकायदा चालणार्‍या गोष्टींना आळा घातल्यास मराठी तरुण व्यवसाय करण्यास सक्षम आहे. सरकारने भूमिपुत्रांना प्राधान्य दिल्यास आम्ही 100 टक्के भैय्यांचा सामना करू.
– कपिल पाटील, मालक, हे फिश हब
First Published on: September 22, 2020 4:19 PM
Exit mobile version