उरण पोलिसांच्या दादागिरीने दत्तजयंतीच्या मेळ्यावर विरजण

उरण पोलिसांच्या दादागिरीने दत्तजयंतीच्या मेळ्यावर विरजण

दत्तजयंती

शनिवारी पार पडलेल्या येथील सर्वात मोठ्या दत्तजयंतीच्या मेळ्यावर पोलिसांनी घातलेल्या अटकावामुळे उरणकरांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. कोणतेही कारण न देताच पोलिसांनी रात्री साडेअकरा वाजताच हा मेळा गुंडाळायला लावला. या मेळ्यासाठी पंचक्रोशीतून प्रचंड संख्येने भाविक उरणमध्ये आले होते. भाविकांच्या सुरक्षेनिमित्त आवश्यक यंत्रणा राबवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच गैरवर्तणूक करणार्‍यांचा बंदोबस्त करण्याऐवजी पोलिसांनी मेळावाच गुंडाळण्याचा आचरटपणा केला. अशा सार्वजनिक कार्यक्रमात संयमाने वागणार्‍या पोलिसांनी उरणकरांच्या श्रध्देलाच हात घालून मेळ्यालाच आवरायला लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उरणमध्ये दत्तजयंतीचा सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. महत्वाच्या मेळ्यांमधील दत्तजयंतीचा मेळा हा या भागातील सर्वात मोठा मेळा समजला जातो. दत्तजयंतीच्या निमित्त मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हातील असंख्य भाविक उशिरापर्यंत मेळ्यात सहभागी होतात. खरेदी विक्रीच्या निमित्ताने या मेळ्यात दूर दूरहून लोक खरेदी विक्रीच्या निमित्त येत असतात. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या या मेळ्यात अक्षरश: कोट्यवधी रुपयांंच्या वस्तूंची आणि खरेदी-विक्री होत असते. बहुतांश वस्तू या मेळ्यात विक्रीसाठी ठेवल्या जात असल्यामुळे ग्राहकांना ती एक पर्वणीच मानली जाते. यामुळे दूरदूरहून येणार्‍यांच्या गर्दीचा प्रचंड महापूरच या मेळ्याला लोटतो.

शनिवारच्या या मेळ्यालाही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. लाखोंच्या संख्येने भाविक यानिमित्त उपस्थित होते. विशेष म्हणजे पेन्शनर्स पार्क ते चारफाटा आणि नागावरोड ते कोटनाका अशा पाच चौरस किलोमीटरचा परिसर फुलून गेला होता. भाविकांनी शहरभर दुतर्फा गर्दी केली होती. छोट्या व्यावसायिकांना खरे तर या गर्दीने पर्वणी मिळवून दिली होती. गर्दीमुळे या लहान विक्रेत्यांच्या तोंडावर समाधान दिसत होते. चांगल्या विक्रीची संधी मिळेल, असे वाटत असताना पोलिसांनी मात्र यावर सार्‍यावर विरजण टाकले.

बंदोबस्तापासून दूर गेलेले पोलीस रात्री ११ वाजताच अवतरले आणि त्यांनी विक्रेत्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. भर गर्दीतील दुकाने बंद करण्यासाठी पोलीस दादागिरी करताना दिसत होते. पोलिसांच्या या अडेल कृतीवर मेळ्यातील उपस्थित नाराज होते. पण एकाही पुढार्‍याने याबाबत पोलिसांना जाब विचारला नाही. यामुळे फुललेले मेळा रात्री साडेअकरावाजताच कोमजला. या मेळ्याच्या निमित्ताने काही व्यक्ती नशेली पदार्थांची विक्री करत असल्याचे निमित्त पोलीस करत आहेत. मात्र या पदार्थांची विक्री करणार्‍यांचा बंदोबस्त करण्याऐवजी पोलिसांनी भाविकांनाच वेठीस धरल्याने पोलिसांच्या एकूणच कृतीची लोक चिरफाड करू लागले आहेत.

निमित्त नशेबाजांच्या बंदोबस्ताचे
या मेळ्यात नशेबाजांना आवर घालण्यासाठी मेळा लवकरात लवकर बंद करण्यात आला, असा खुलासा बंदोबस्तावरील एका पोलिसाने केला. नशेतील व्यक्तीमुळे मेळ्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणूनच मेळा थांबवावा लागला असे या पोलिसाने म्हटले आहे.

First Published on: December 24, 2018 4:54 AM
Exit mobile version