मिठागरांच्या जागा विकसित होणार

मिठागरांच्या जागा विकसित होणार

मुंबईतील मिठागरांच्या विकासासाठी अनेक अडचणी असल्या तरीही शक्यप्राय अशा ठिकाणी विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील मिठागरांच्या जागांवर विकासासाठी सर्वाधिक वाव हा पूर्व उपनगरात आहे, असे एमएमआरडीएचे मत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पूर्व उपनगरात मिठागरांसाठी आरक्षित जागेवर विकास करण्यासाठी आता एमएमआरडीएने नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सध्या मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात २१७७ हेक्टर जागा मिठागरांसाठी आरक्षित आहे. दहिसर, गोरेगाव, मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, नाहुर, घाटकोपर, मंडाले, चेंबुर, वडाळा तसेच आणिक या जागेत मिठागरांच्या आरक्षण आहे. या जागेपैकी ३१ ठिकाणी मीठ तयार करण्यात येते. तर ४ ठिकाणी सॉल्ट फॅक्टरी आहेत. यापैकी १०७ हेक्टरवर वसलेल्या २४ मिठागरांकडे परवाना आहे, तर 1032 क्षेत्रात वसलेली ७ मिठागरे ही भाडे तत्त्वावर आहेत.

पण मालवणी, चेंबुर, घाटकोपर, पहाडी आणि दहिसर याठिकाणी कोणताही विकासासाठी वाव नसल्याचे एमएमआरडीएचे मत आहे. जवळपास १५६ हेक्टरवर अतिक्रमण झाले आहे. तर १८ हेक्टर जमीन भारत सरकारला हस्तांतरण करण्यात आली आहे. तर १७२ हेक्टर जमीन ही सीआरझेडच्या क्षेत्रात आहे.

इथे विकास शक्य

कांजूर, भांडूप, नाहुर, तुर्भे, मंडाले, माटुंगा, मंडाले तसेच आणिक या भागातील १८३१ हेक्टर जागेपैकी २५६ हेक्टर जागेवर विकासासाठी वाव असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. तर उर्वरित १५७५ हेक्टर जागा ही सीआरझेड आणि वन विभागाच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे याठिकाणी विकास करणे शक्य नाही.

First Published on: October 17, 2019 5:43 AM
Exit mobile version