गरिबाला हवायं फक्त किराणा; पालिका हेल्पलाईनवर ३ दिवसांत ४०९ लोकांनी मागणी

गरिबाला हवायं फक्त किराणा; पालिका हेल्पलाईनवर ३ दिवसांत ४०९ लोकांनी मागणी

‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेक गरीब आणि गरजू तसेच निराधार कुटुंबांची परवड होवू लागली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्ती तथा कुटुंबांपर्यंत मदत पोहोचली जावी यासाठी महापालिकेच्यावतीने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर तीन दिवसांमध्ये ४०९ लोकांनी संपर्क साधला आहे. मात्र, लोकांकडून शिजवलेल्या अन्नापेक्षा जीवनावश्यक वस्तू असलेल्या किराणा मालाच्या पुरवठ्यासाठीचीच अधिक मागणी आहे.

हेही वाचा – धक्कादायक! ‘त्या’ मेळाव्यातील १०६ जण पुणे विभागात; विभागीय आयुक्तांची माहिती

तीन दिवसांच्या कॉल्सचा आढावा

मुंबई महापालिकेने गरीब, गरजू लोकांनी उपाशी राहू नये, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली जावी. त्यांना अन्नधान्य तसेच जेवण पुरवता यावे यासाठी १८०० २२१ २९२ ही हेल्पलाईन ३० मार्चपासून सुरु केली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२० पर्यंत घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये शहर आणि दोन्ही उपनगरांतून एकूण ४०९ लोकांनी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे. त्यापैकी ५५ लोकांना त्यांच्या मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा करण्यात आला असून उर्वरीत ३२५ लोकांची मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिकेचा तक्ता

सर्वाधिक मागणी जी-उत्तर विभागातून

यामध्ये शहर भागातून १५५, पूर्व उपनगरांतून ११३ आणि पश्चिम उपनगरांतून १४१ लोकांनी या हेल्पलाईनद्वारे मदत मागितली आहे. यामध्ये ३५४ लोकांनी जिवनावश्यक असलेल्या अन्नधान्याची मागणी केली आहे. तर केवळ ३९ लोकांनी जेवण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तर ४ लोकांनी जे शक्य आहे ते द्यावे आणि ६ लोकांनी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी याद्वारे केली असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे सर्वाधिक मागणी ही माहिम, दादर धारावी या जी-उत्तर विभागांमधून ८० हून अधिक लोकांनी मदत मागितली आहे.

First Published on: April 1, 2020 9:02 PM
Exit mobile version