राज्यात मतपत्रिकेद्वारे मतदानाची शक्यता धूसर

राज्यात मतपत्रिकेद्वारे मतदानाची शक्यता धूसर

अनेक राजकीय पक्षांनी आगामी निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, असा तगादा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लावला आहे. अनेक राज्यांतून काही राजकीय शिष्टमंडळांनी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेटही घेतली, पण महाराष्ट्रात आगामी दिवसात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी मतपत्रिकांद्वारे निवडणुकीच्या शक्यतेवर जवळपास पूर्ण विराम मिळाला आहे. राज्यात मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविणे आता शक्य नसल्याचे संकेतच निवडणूक विभागाने दिले आहेत.

ईव्हीएम मशीनवरून पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेणे ही सुरक्षिततेच्यादृष्टीने आव्हानात्मक प्रक्रिया असल्याचे मत राज्य निवडणूक आयोगातील अधिकार्‍यांचे आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात मतपत्रिका छापणे हीदेखील खर्चिक गोष्ट आहे. शिवाय मतपत्रिकांद्वारे मतमोजणी ही सर्वात वेळखाऊ प्रक्रिया असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. निवडणुकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत असताना मतपत्रिकेद्वारे मतदान म्हणजे पुन्हा काळाच्या मागे जाण्यासारखे आहे, असे मत अधिकार्‍यांनी मांडले आहे.

राजकीय पक्षांनी जुनी मतपत्रिकांची पद्धत अवलंबण्यापेक्षा सध्याच्या पद्धतीत आणखी अपेक्षित गोष्टी सांगणे गरजेचे आहे. सध्या निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी रॅण्डम सॅम्पलींगची पद्धत तसेच व्हीव्हीपॅटच्या जास्त मशीनची मोजणी यासारखे पर्याय हे राजकीय पक्षांपुढे आहेत. पण जितक्या व्हीव्हीपॅट मशीन मोजणीसाठी वाढणार तितकाच निवडणुकीचा अंतिम निकाल निश्चित होण्याचा कालावधी वाढणार असेही मत अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.

First Published on: July 11, 2019 5:31 AM
Exit mobile version