आजपासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारला घेरले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर भाजपने आज विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. ‘मी पण सावरकर’, असा संदेश लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून भाजप आमदारांनी सरकारवर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी, राहुल गांधी यांनी माफी मागण्याच्या प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच सावरकरांच्या नावाचा उपयोग केवळ राजकीय पोळी भाजण्यसाठी केला जात असल्याचे देखील ते पुढे म्हणाले.
भाजपाचे खासदार, आमदार बलात्कारांच्या प्रकरणात
‘देशात होणारे बलात्कार, महिलांवरील अत्याचार याविषयी यांना काहीच चिंता वाटत नाही. कारण भाजपाचे खासदार, आमदार आणि त्यांचे नेते बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये आहेत. तसेच याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी वक्तव्य केले आहे. मग त्यांनी माफी का आणि कशी मागावी? त्याचप्रमाणे विरोधक आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आमची कोंडी होऊच शकत नाही, सभागृहात १७० पेक्षा अधिकजण महाविकास आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे सरकारची कोंडी होण्याचा प्रश्नच उद्धवत नाही’, असे देखील अशोक चव्हाण पुढे म्हणाले आहेत.
हेही वाचा – ‘मी पण सावरकर’ भगव्या टोप्या घालून भाजपचे आमदार आक्रमक