अंबरनाथच्या केमिकल कंपनीतील दुर्घटनेत टाकीत गुदमरून ३ कामगारांचा जागीच मृत्यू

अंबरनाथच्या केमिकल कंपनीतील दुर्घटनेत टाकीत गुदमरून ३ कामगारांचा जागीच मृत्यू

अंबरनाथ पश्चिमेच्या एका केमिकल कंपनीत टाकी साफ करताना गुदमरून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या कंपनीत रासायनिक भूमिगत टाकीत सकाळच्या सुमारास साफसफाईसाठी हे तीन कामगार उतरले होते. त्यावेळी टाकीतून अचानक गॅस गळती होऊन या कामगारांचा श्वास गुदमरला. त्यामुळे त्यांना टाकीच्या बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे काम करणार्‍या कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने पुरवण्यात आली नव्हती. शिवाय एवढी मोठी दुर्घटना घडली असताना कंपनी प्रशासन आणि काम करणार्‍या ठेकेदारांपैकी कोणतीही जबाबदार व्यक्ती तिथे उपस्थित नव्हती.

अंबरनाथ पश्चिम भागात इंडस्ट्रियल ईस्टर केमिकल कंपनी आहे. या कंपनीत क्रूड ऑईलच्या तीन भूमिगत टाक्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून या टाक्यांची सफाई करण्यात आली नव्हती. महत्वाचे म्हणजे या कंपनीत असलेल्या मोठ्या टाक्यांना रंग लावण्याचे काम हे कामगार करत असताना अचानक शनिवारी सकाळी त्यांना या भूमिगत टाक्यांची सफाई करण्यास सांगितले. मात्र, याकरता त्यांना सुरक्षेची कोणतीही साधने पुरवण्यात आली नव्हती. सकाळी साडेआठच्या सुमारास पाच कामगार ही टाकी साफ करण्यासाठी उतरले. तिथे वायूगळती झाली. त्यावेळी कामगारांना त्याचा त्रास झाला. त्यातील दोन कामगार टाकीतून बाहेर पडले. मात्र, तिघांना गॅसची जास्त बाधा झाल्याने त्यांना टाकीच्या बाहेर पडणे शक्य झाले नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दिनेश सहानी, बिंदेश सहानी आणि हर्षद इस्तर असे मृत झालेल्या कामगारांचे नाव आहे. कंपनीत ही दुर्घटना सकाळी साडेआठ वाजता घडली. मात्र, इतर कामगार ३ तास या मृत कामगारांना टाकीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते. त्यांना त्यात यश आले नाही. अखेर ३ तासांनंतर कंपनी प्रशासनाने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने दोरीच्या सहाय्याने या तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली. अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून कामगारांचे मृतदेह ताब्यात घेत ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या सगळ्या प्रकरणात ठेकेदार आणि कंपनी प्रशासनाचा प्रथमदर्शनी निष्काळजीपणा दिसत असून कायदेशीर कारवाई करणार आहोत. शिवाय टाकीत कोणते क्रूड ऑईल होते याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.

काम सुरू असताना ठेकेदार अनुपस्थित
कंपनीत टाक्यांचा रंग आणि साफसफाई करण्यासाठी एका ठेकेदाराला काम देण्यात आले होते. मात्र, त्याने कामगारांना हे काम करत असताना सुरक्षेची कोणतीही साधने पुरवली नव्हती. ती पुरवली असती तर ही दुर्घटना घडली नसती, असे इतर कामगारांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर काम सुरू असताना ठेकेदार कंपनीत उपस्थित देखील नव्हता. कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत पुरवण्याची जबाबदारीही ठेकेदार आणि कंपनी प्रशासनाची असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

First Published on: March 28, 2021 5:00 AM
Exit mobile version